सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात आज विशेष समिती गठीत करण्यात आली.
अध्यक्षपदी अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या समितीचे सदस्य असणार आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. नुकताच मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे, वादग्रस्त वक्तव्यावरून याची झलक कोगनोळी नाक्यासह राज्यभर पाहण्यास मिळाली. दोन्ही राज्यांत तेढ निर्माण होत असल्यामुळे सीमाभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय गृह विभागाने आज घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत नियोजन झाले होते. त्यानुसार राज्याच्या गृह विभागाकडून आज ही समिती गठीत केली. समितीचे अध्यक्ष अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के. के. सारंगल हे असतील, तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, तर कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश होणार आहे. श्री. सारंगल हे सध्या रजेवर असून सोमवारी ते हजर होणार आहेत.

