मंगळवेढा / खबऱ्या प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी येथे एका बांधकामाच्या ठिकाणी नदीपात्रातील बेकायदा वाळू उपसा करून वाहनातून आणून ते खाली करत असताना पोलिसांना पाहताच वाहनचालक वाहन घेवून फरार झाले.
याप्रकरणी दत्तात्रय सर्जे माळी (रा.शेलेवाडी), बिरा उर्फ सोहन बनसोडे (रा . लक्ष्मी दहिवडी) व दोन अशोक लेलंट टमटमचे चालक व मालक यांच्याविरूध्द वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी पोलिस खंडाप्पा शिपाई पोलिस हत्ताळे, सहाय्यक निरिक्षक बापूसो पिंगळे, चालक पोलिस हवालदार वाघमारे हे पेट्रोलिंग करीत असताना शेलेवाडी येथे
रात्री १२.३० वा. आले असता तेथे आरोपी दत्तात्रय माळी यांच्या घराचे बांधकाम चालू होते. तेथे अशोक लेलंट कंपनीचे दोन टमटम वाळू खाली करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यावेळी पोलिस पकडण्यास जात असताना टमटम चालकाने वाळू खाली करून टमटमसह पळून गेले. त्या वाहनाची शोधाशोध केली मात्र पोलिसांना ते वाहन मिळून आले नाही.
सदर बांधकामाच्या ठिकाणी तीन हजार रुपये किमतीच्या दीड ब्रास वाळूचा ढिगारा होता. बांधकाम मालक दत्तात्रय माळी यांना याबाबत विचारले असता सदरचे बांधकाम स्वतःचे चालू असून लक्ष्मी दहिवडी येथील बिरा उर्फ सोहन बनसोडे याला मोबाईल करून वाळू आणावयास सांगितले होते.
वाळू परवान्याबाबत विचारले असता कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगून दोन अशोक लेलंट कंपनीचे टमटमने बांधकामाचे ठिकाणी वाळू आणून टाकली असल्याचे सांगितले.
ही वाळू चोरीची असल्याची खात्री पटल्यानंतर वरील आरोपीविरूध्द वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक विभुते हे करीत आहेत.
दरम्यान, महसूल विभागाची पथके कार्यरत नसल्यामुळे मोठया प्रमाणात भिमा व माण नदीपात्रातून रात्रीच्यावेळी वाळू उपसा होत असतानाही महसूलचे प्रांताधिकारी व तहसीलदार चिडीचूप असल्याने शासनाला याचा मोठा फटका बसत आहे.
कारखाना बायपास रोडला रात्रभर वाहनातून रस्त्यावर वाळू पडत असल्याने मोटर घसरून पडत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याकामी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून चोरटी वाळू वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.