कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र आज स्पष्ट होणार असून आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कडेगाव तालुक्यातील नेवरीत सरपंच पदासाठी ८ तर १३ सदस्यांच्या जागांसाठी ५० अर्ज दाखल झाले आहेत. तर आंबेगाव मध्ये सरपंच पदासाठी तब्बल १९ आणि ९ सदस्यांच्या जागांसाठी ७२ अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका लागल्या असून आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने यामध्ये कोण कोण माघारी घेतंय आणि कोणकोण निवडणुकी च्या रिंगणात उतरतय हे स्पष्ट होणार आहे.थेट जनतेतून सरपंच असल्याने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आपणच सरपंच होणार आणि गावचा सर्वांगीण विकास आपणच करणार अशी इच्छा मनी बाळगून अनेक जण कामाला लागले आहेत हेच दाखल झालेल्या अर्जाच्या आकडेवारी स्पष्ट होतंय. परंतु ऐनवेळी गावपातळीवर बैठका होऊन एकास एक लढत होण्यासाठी प्रयत्न होणार हे मात्र स्पष्ट आहे,तरीही ऐनवेळी बंडखोरी झाल्यास कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान होतंय हे पाहणे गमतीचे ठरणार आहे.
उमेदवारी अर्ज विक्रमी दाखल झाले असले तरी निवडणूक कशी होईल हे चित्र आज नक्की स्पष्ट होणार आहे, परंतु नाराजांची नाराजी दूर करताना नेते मंडळींची पुरती दमछाक होणार आहे हे मात्र निश्चित.