Pik Karj : शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. भांडवलाची उभारणी करण्यासाठी अनेकदा शेतकरी बांधवांकडे पैशांची कमतरता राहते यामुळे शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव बँकेकडून पीक कर्ज घेत असतात.
मात्र आता पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधवांचा सिबिल स्कोर चांगला असणे अनिवार्य आहे. सिबिल स्कोर ही पीक कर्जासाठी लावण्यात आलेली एक जाचक अट आहे. यामुळे अनेकदा शेतकरी बांधव पीक कर्जापासून वंचित राहतात. शेतकरी बांधवांचा सिबिल स्कोर चांगला राहत नसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पीक कर्ज मिळत नाही.
अशा परिस्थितीत आज आपण सिबिल स्कोर पीक कर्जासाठी लावणे अनिवार्य आहे का याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सिबिल स्कोर हा कर्जदार व्यक्तीचे बँक रेकॉर्ड तपासण्यासाठी उपयुक्त असतो. म्हणजेच सदर कर्जदार व्यक्तीने कर्ज घेतल्यानंतर कर्जाची व्यवस्थितरित्या परतफेड केली आहे की नाही याचा एक अंदाज सिबिल स्कोरच्या माध्यमातून बांधला जातो.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 पॉईंट दरम्यान चेक केला जातो. यामध्ये देखील 750 प्लस सिबिल स्कोर असणे कर्ज घेण्यासाठी आवश्यक असते. बिल स्कोर हा पीक कर्जासाठी देखील बंधनकारक करण्यात आला असून सिबिल स्कोर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तसेच वाहनांवर कर्ज घेण्यासाठी आवश्यक असतो. साडेसातशे पेक्षा अधिक सिबिल स्कोर असेल तर सहज कर्ज मिळत असते मात्र यापेक्षा कमी सिबिल स्कोर असेल तर कर्जदाराला कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करतात. मात्र शेतकरी बांधवांना दिले जाणारे कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यामध्ये खूपच फरक आहे.
शेतकरी बांधवांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी कुठे ना कुठे मायबाप शासनाचे आर्थिक साहाय्य लाभलेले असते. अशा परिस्थितीत वैयक्तिक कर्जसाठी सिबिल स्कोर असणे ठीक आहे. मात्र शेतकरी बांधवांना दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी सिबिल स्कोरची जाचक अट कुठे ना कुठे शेतकरी बांधवांना पीक कर्जापासून वंचित ठेवत आहे. मित्रांनो खरं पाहता राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना किती पीक कर्ज मिळालं पाहिजे त्याविषयी अभ्यास केला जातो आणि त्यानुसार शेतकऱ्यांना एकरी किंवा हेक्टरी किती पीक कर्ज मिळावं याविषयी निर्णय घेतला जातो.
हाती आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना फळबाग पिकासाठी हेक्टरी एक लाखांपर्यंतच पीक कर्ज हे मंजूर केलं जातं. तसेच इतर बागायती पिकासाठी जसे की सोयाबीन तूर कापूस ऊस यासाठी बँकांकडून चाळीस हजार रुपये हेक्टरी एवढं पीक कर्ज मंजूर केलं जात. खरं पाहता पीक कर्ज हे एकरी सरासरी तीस हजार रुपये इतकं असते. तसेच जर कर्जदाराचे मागील बँकेतील व्यवहार चांगले असतील तर यापेक्षा अधिक कर्ज देखील दिले जाते काही शेतकऱ्यांना 50 हजार एकर पर्यंत कर्ज मिळत.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा बोजा हा संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावर चढवला जातो. एकंदरीत संबंधित शेतकऱ्याची शेत जमीन ही पीक कर्जासाठी तारणच ठेवली जाते. विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना जे काही पीक कर्ज दिले जातं त्यासाठी बँकांना नाबार्ड कढून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत निधीची उपलब्धता ही करून दिली जाते. एवढेच नाही तर कर्जासाठी असलेलं व्याज देखील शासनाकडून बँकांना वर्ग केल जात. म्हणजेच बँक केवळ एक मध्यस्थी म्हणून या ठिकाणी काम करत असते. मात्र असे असले तरी पीक कर्ज देताना बँकांकडून नाहक जाचक अटी लादल्या जातात. यामध्ये शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवणे किंवा मग पीक कर्जासाठी अधिक व्याज वसूल करणे असं देखील बँकांकडून केलं जातं. सातबारावर बोजा चढवणे किंवा व्याजदर आकारणे हा बँकेच्या नियमाचा भाग आहे मात्र यामध्ये जो अडसर येतो आहे तो आहे सिबिल स्कोरचा.
सिबिल स्कोरची अट घालून बँकाकडून शेतकरी बांधवांना अप्रत्यक्षरीत्या पीक कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. खरं पाहता शेतकरी बांधवांचे सिबिल स्कोर हे अनेक कारणांमुळे डाऊन असतात. शेतकरी बांधवांनी कुठल्या एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि खर्चाची थकबाकी असेल तर त्यांचा सिबिल स्कोर हा खाली आलेला असतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना आवश्यक असलेले पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे आता अनेक शेतकरी संघटनांकडून सिबिल स्कोरची जाचक अट रद्द करण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सिबिल स्कोर विरहित पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आवाज उठवला जात आहे.
या खरीप हंगामात सिबिल स्कोरच्या या जाचक अटीमुळे अनेक शेतकरी बांधव पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे सोबतच भांडवलासाठी पैशांची उभारणी शेतकरी बांधवांना शक्य न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठे नुकसान सहन कराव लागल आहे. दरम्यान आता पीक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोरमध्ये शिथिलता दिली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. निश्चितच येत्या खरीप हंगामात तरी शेतकऱ्यांना सिबिल स्कोर पासून मुक्तता मिळेल अशो आशा आहे.