राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हर, हर महादेव चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे शिवाजी महाराजांची बदनामी झाली आहे. या बदनामीला विरोध करत असल्याने अटकेची कारवाई होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकार मला शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यापासून रोखत आहे, हे सरकार कोणाचे आहे हे स्पष्ट होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.
ही सरकारची दडपशाही : आव्हाड
राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांनी लावलेली कलमे ही जामिनपात्र गुन्हे होते. त्यानंतर आणखी काही कलमांतंर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची दडपशाही असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.