मिरज : खुनाचा प्रयत्न, अपहरण, गर्दी मारामारी यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची मालिका रचून प्रचंड दहशत निर्माण केलेल्या मिरजेतील ढेरे टोळीला मंगळवारी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले.
टोळीत तिघांचा समावेश आहे. नूतन जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी कारवाईचा हा दणका दिला. टोळीचा म्होरक्या प्रथमेश सुरेश ढेरे (वय 21), विशाल बाजीराव शिरोळे (20, दोघे रा. होळी कट्टा मंगळवार पेठ, मिरज) व सूरज चंदू कोरे (22, ढेरे गल्ली, पाटील हौदाजवळ, मिरज) अशी तडीपार केलेल्या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना तडीपार कारवाईचा आदेश बजावण्यात आला आहे. आता त्यांना ताब्यात घेऊन सांगली व कोल्हापूर हे दोन जिल्हे सोडून ते कुठे राहणार आहेत, याची विचारणा करून त्यांना संबंधित जिल्ह्यात सोडले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यांच्यावर अपहरण करणे, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दहशत माजविणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे असे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी टोळीतील गुन्हेगारांना अनेकदा अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. मिरज शहर पोलिसांनी या टोळीविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढून त्यांच्याविरूद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांना सादर केला होता. गेल्या काही दिवसांपासून या प्रस्तावर सुनावणी सुरू होती. ती मंगळवारी पूर्ण झाली. डॉ. तेली यांनी टोळीतील तिघांनाही सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश बजावला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, मिरज शहरचे निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक फौजदार सिद्धाप्पा रुपनर, हवालदार दीपक गट्टे, ऋषी बडणीकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.