वांगीत प्रतिबंधात्मक पावले इतर ठिकाणी प्रशासन ढिम्मच
कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील वडिये रायबाग, शेळकबाव, वांगी, नेवरी आणि कान्हरवाडी या ठिकाणाहून अवैध वाळू तस्करी पुन्हा जोमाने सुरू झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून स्थानिक लोकांच्या तक्रारी नंतर वांगीत नदीला जाणाऱ्या रस्त्याना मोठ्या चरी मारण्यात आल्या असून इतर ठिकाणी प्रशासन अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना सुद्धा दिसून आली नाही यावरून स्थानिक प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे की काय ? असा सवाल येरळा काठच्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शेळकबाव येथे वाळू तस्करांकडून शेतकऱ्यांना मारहाण प्रकरण अजून ताजेच असताना पुन्हा अवैध वाळू तस्करीने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कडेगाव तालुका आणि अवैध वाळू तस्करी हा विषय काही नवीन नाही. तालुक्यातील ठराविक गावांमधून राजरोस पणे अवैध वाळू तस्करी सुरू असते आणि स्थानिक प्रशासन ढिम्म असते. याचा नेमका अर्थ काय होतो हे सर्वज्ञात आहे.फेब्रुवारी मध्ये वाळू तस्करांची माहिती प्रशासनाला दिली आणि बातमी लावली म्हणून सूरज जगताप या पत्रकाराला तस्करांनी मारहाण केली होती. या प्रकरणानंतर पत्रकरांनी मोठे आंदोलन केले होते. यात मारहाण करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याखेरीज कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे पाहायला मिळाले नाही. काही महिने उलटतात तोपर्यंत शेळकबाव येथे प्रशासनास वाळू तस्करीची माहिती दिली म्हणून तस्करांनी दोन शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली होती. एवढं सगळं होत असताना आणि येरळा काठच्या शेतकऱ्यांकडून सहकार्य होत असताना तहसील प्रशासन वाळू तस्करांवर कारवाई करण्याऐवजी ढिम्म का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर अवैध वाळू तस्करीची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांची नावे तस्करांना कशी काय समजतात ?असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.
अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमलेली ठराविक गस्ती पथके सुद्धा काही ठिकाणी (जिथं हमखास अवैध वाळू वाहतूक चालते) तिथं गस्त घालण्यासाठी जात नाहीत असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
अवैध वाळू तस्करी वेळीच रोखावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आता निर्णायक आंदोलन उभा करू असा इशारा येरळा काठच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.
दिवाळीत वाळू तस्करांकडून उचली?
नुकताच दिवाळीचा सण साजरा झाला. या सणाच्या निमित्ताने तहसील प्रशासनातील काही लोकांनी अवैध वाळू तस्करांकडून उचली घेतल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त खबऱ्याला मिळाले आहे. त्या काळात नदीला पाणी असल्याने अवैध वाळू तस्करी बंद होती म्हणून वाळू तस्करांना फोन करून बोलवून घेऊन उचली घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

