सांगली: खबऱ्या प्रतिनिधी / केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या लोकाप्रण सोहळ्यात पालकमंत्री जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले.
मंत्री कामे पूर्ण करण्यासाठी मार्ग काढत असतात, कामाचा झपाटा वाढवायचा असतो. त्यात गडकरी यांचा आदर्श घेण्यासारखा आहे असे कौतुक जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.
जयंत पाटील यांनी पेठ ते सांगली रस्त्याच्या मुद्यावरून दोन वेळा नितीन गडकरी यांना भेटल्याचे सांगितले. त्यावर गडकरी यांनी जयंतरावांची मागणी मान्य केल्याचे सांगून येत्या चार महिन्यात पेठ-सांगली रस्त्याची निविदा काढली जाईल, अशी घोषणा केली. जयंत पाटील यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्याचे अर्धवट काम, ड्रायपोर्टला मान्यता आदी मुद्यांकडे गडकरींचे लक्ष वेधून घेतले.
फाटक लावून विमान उतरेल
जयंत पाटील यांनी जिल्ह्यात विमानतळ नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात विमान उतरेल, तशी व्यवस्थाच मी सांगली-सोलापूर रस्त्यावर करत आहे, असे सांगितले. जसे फाटक लावून रेल्वे धावते, तसे येथे फाटक लावले जाईल आणि तेथे विमान उतरेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

