पिंपरी : यमलोक महामार्ग ठरलेल्या चाकण-तळेगाव या २२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर एक हजार खड्डे पडले आहेत. त्याबाबत मोठा पाठपुरावा करूनही ते बुजविण्यात न आल्याने चाकण-तळेगाव महामार्ग कृती समितीने त्यावर निषेधाची खड्डे रांगोळी आज साजरी केली.
समितीने या महामार्गावरील ब्लॅक स्पॉट असलेल्या इंदूरी येथील पन्नास खड्डे बुजवून त्यातील दोन खड्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी व स्थानिक खासदार (मावळ) श्रीरंग बारणे यांची नावे दिली. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा झाली.
तळेगाव-चाकण महामार्गावरील जीवघेणे खड्डे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्त होत नसल्यामुळे तळेगाव-चाकण महामार्ग-/241 कृती समितीने आज अचानक हे गांधीगिरी आंदोलन केले. खड्डे बुजवत,त्यावर दिव्यांची रांगोळी काढून या खड्ड्यांना गडकरी आणि खा. बारणेंची नावे देत त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
पथदिवे नसलेल्या महामार्गावरीलअपघातग्रस्त इंदूरी या ठिकाणचे मोठे खड्डे समितीने माती टाकून बुजविले. नंतर त्यावर दिव्यांची रांगोळी काढली.तेथे घोषवाक्य लिहून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींचा निषेध केला. समिती अध्यक्ष नितीन गाडे,उपाध्यक्ष दिलीप डोळस,सचिव अमित प्रभावळकर, प्रमोद दाभाडे,संजय चव्हाण,चेतन डोळस तसेच जागरुक वाचक कट्टा समूहाच्या सदस्या विद्या काशीद,भास्कर माळी आदींनी या आंदोलनात भाग घेतला.
यानंतर हे खड्डे बुजवले जातील,असा आशावाद समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. मात्र,जर तसे झाले नाही,तर येत्या १ तारखेला समिती सदस्य मुंडन आंदोलन करतील,असा इशारा समिती उपाध्यक्ष दिलीप डोळस यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिला आहे.
दरम्यान,हे खड्डे भरताना देखील वडगाव आणि चाकण अशा महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अवजड वाहने सोडण्याच्या वाहतूक पोलीसांच्या बेफिकीरीचाही समितीच्या सदस्यांनी निषेध केला.
अवजड वाहनांची २४ तास मोठी वर्दळ असलेला दोन एमआयडीसी जोडणारा तळेगाव-चाकण महामार्ग अतिशय अरुंद आहे.त्यातही तळेगाव-चाकण या अपघातग्रस्त टापूत पाच वर्षात २५२ बळी गेल्याने कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भात समिती उपाध्यक्ष डोळस म्हणाले, सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही पोलिस प्रतीट्रक दोनशे-तीनशे रुपये घेऊन त्या वेळेत ते ती सोडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. त्यात खड्यांनी आणखी भर पडली आहे. म्हणून त्याच्या निषेधार्थ या पावसाळ्यात समितीने खड्ड्यांत बेशरम वनस्पती लावून आंदोलन केले. रास्ता रोकोही केला.
महामार्ग दुरुस्तीबाबत खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळचे खा.बारणे यांना अनेकदा मेल केले. पाठपुरावा केला.पण,त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही.फक्त स्थानिक आमदार मावळचे सुनील शेळके यांनी प्रतिसाद देत सहा कोटी रुपयांचा निधी आणला. त्यातून मावळच्या हद्दीतील महामार्गाचीच दुरुस्ती झाली.पण,पुढे चाकणपर्यंत व त्यापुढेही शिक्रापूर आणि न्हावरे या १०४ किलोमीटर अंतरात अपघात हे पाचवीलाच पुजलेले आहेत.

