मुंबई: पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकमत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
त्यामुळे पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याचं देखील समजतं आहे.
रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चांना रविवारपासूनच उधाण आलं आहे.
रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे एकत्रीत कार्यक्रम असताना देखील ते या कार्यक्रमांना एकत्र आले नव्हते तेंव्हापासून या दोघांमध्ये काही बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील पोलिस भरती हा राज्याच्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या काळात देखील याच मुद्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाले होते.