भ्रष्ट कारभारामुळे तालुक्याची नाहक बदनामी
सर्वसामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया
कडेगाव:- सोमवारी दि १० ऑक्टोबर रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील महिला तलाठी मनीषा कुलकर्णी हिला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडत अटक केली. तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून चव्हाण यास लाचलुचपत विभागाने अटक करून बहुधा महिना ही उलटला नसावा तोपर्यंत ही दुसरी कारवाई त्यामुळं आता कडेगाव महसूलला आत्मपरीक्षण करून स्वच्छतेची गरज असल्याचं उघड उघड बोललं जातं आहे. भ्रष्ट लोकांच्या भ्रष्ट कारभारामुळे मात्र कडेगाव तालुक्याची सर्वत्र नाहक बदनामी सुरू असून लोकप्रतिनिधीनी यामध्ये लक्ष घालावे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वांना समज द्यावी लोकांच्या कामाच्या बाबतीत असणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.
तहसील कार्यालयातील लाचलुचपत विभागाची कारवाई होऊन बहुधा महिना ही उलटला नसावा तोपर्यंत खेराडे वांगी येथील महिला तलाठी मनीषा कुलकर्णी ही अगदी किरकोळ कारणासाठी म्हणा किंवा तिच्या कर्तव्या साठीच लाच मागत होती आणि ती घेताना रंगेहात सापडली ही अतिशय वाईट घटना असून काही निवडक कर्मचारी/अधिकारी सोडले तर सध्या महसूल मध्ये सर्वसामान्य जनतेला ओरबडून खायचं काम सुरू आहे असे स्पष्ट होत आहे. हे सगळं होत असताना वरिष्ठ अधिकारी संबंधित कर्मचाऱ्यांची तक्रार येऊनही कोणतीही कार्यवाही करण्यास तयार नाहीत हे कोणत्या मानसिकतेचे लक्षण म्हणावे ? हेच समजेना.
महसूल विभागाच्या काही कर्मचारी/अधिकाऱ्यांनी लाच मागण्यासाठी विशिष्ठ शब्द किंवा वाक्ये तयार केली आहे. आमच्याकडे लक्ष नाही, तुमचं काम हातात घेतलं आहे बरका, हल्ली गाठच घेत नाही, तुम्ही भेटतो म्हणाला होता, माझ्यापुढं भरपूर काम आहे तरीही तुमचं काम पहिलं घेणार आहे, तुमचं तयार करून वरिष्ठांच्या टेबलला ठेवलं आहे… अशी वाक्ये/शब्द वापरून कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना संबंधित कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत नसून त्या व्यक्तीवर मोठा उपकार करीत असल्याचे भासवतात.
गडगंज पगार घेऊनही सर्वसामान्य जनतेकडून चिरीमिरीची लाच मागताना ह्यांना लाज सुद्धा वाटत नाही किंवा चिरीमिरीची लाच मागताना लाज वाटतच असावी म्हणून गेल्या दोन कारवाई मधील आकडा मोठा दिसून आला आहे. एकंदरीतच कडेगाव महसूल विभागाच्या कारभारात आता कोणीतरी लक्ष घालून स्वछता करणेची गरज असून तालुक्याची होत असलेली नाहक बदनामी तसेच सर्वसामान्य लोकांची अडवणूक थांबवावी अशी मागणी होत आहे.