सांगली : खबऱ्या प्रतिनिधी/ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत गटांतर्गत राजकारणाचा संशयकल्लोळ दाटला आहे. दोन सदस्यांच्या फुटीवरून राष्ट्रवादीतील स्थानिक दोन गट एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
गटांतर्गत राजकारणात पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लागले असल्याची चर्चा जोरात आहे.
स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन मते फुटली. पक्षाचे दोन सदस्य मतदानाला आले नाहीत. हे दोन सदस्य मतदानाला आले असते तरी जय-पराजयावर परिणाम झाला नसता. मात्र मतदानाला न आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीत संशयकल्लोळ दाटला आहे.
व्हीप बजावलाच नाही ?
सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी तीनही सदस्यांना व्हीप का बजावला नाही, असा प्रश्न पक्षातूनच उपस्थित केला जात आहे. एक सदस्या तर मतदानापूर्वी दोन-तीन दिवस अगोदरपासून संपर्कात नव्हत्या. तरिही गटनेत्यांनी व्हीप का बजावला नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही गंभीर शंकाही उपस्थित केल्या जात आहेत.
दरम्यान, स्थायी सभापती पदाची निवडणूक असताना राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी कुठे होते. त्यांनी ही निवडणूक गांभिर्याने का घेतली नाही, असाही प्रश्न राष्ट्रवादीतूनच उपस्थित केला जात आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत घडलेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादीतूनच परस्परविरोधी प्रश्न उपस्थित करून संशयकल्लोळ निर्माण केला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रकार गांभिर्याने घ्यावा, अशी मागणीही राष्ट्रवादीतून होऊ लागली आहे.