कडेगाव पूर्व भागातील पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाचा प्रताप
कर्ज मागणाऱ्याकडून उकळले पैसे
कडेगाव:- कडेगाव पूर्व भागातील एका नामवंत पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाने कर्ज मागणीसाठी आलेल्या एका नागरिकाची आर्थिक फसवणूक करीत संस्थेचे कर्ज मंजुरीचे बोगस ठराव आणि बोगस पत्राद्वारे त्याची स्थावर जंगम मालमत्ता संस्थेच्या नावे गहाणखत करून घेतली असून याबदल्यात त्यास देऊ केलेलं कर्ज मात्र देण्यास टाळाटाळ करीत असल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे. कर्ज मंजूर करतो म्हणून या शाखा व्यवस्थापकाने संबंधित नागरिकाकडून भली मोठी रक्कम ही उकळली आहे.
कडेगाव पूर्व भागातील एका पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाने सहकारालाच नव्हे तर माणुसकीला सुद्धा काळीमा फासणारं हे कर्तत्व केलं असून याबाबत संस्थेचे कार्यकारी मंडळ व प्रशासन मात्र त्याला पाठीशी घालत असल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.साधारणपणे २०२१ च्या सप्टेंबर मध्ये विटा शहरातील एका नागरिकाने या पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाशी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मध्यस्थीने संपर्क साधला. आपणास कर्जाची गरज आहे असे सांगितले. संबंधित शाखा व्यवस्थापकाने आपल्याकडे कर्ज मागणी अर्ज करण्यास सांगितला .नंतर कागदपत्र पाहून मी कार्यकारी मंडळ व प्रशासनातील वरिष्ठ व्यक्तींची चर्चा करतो असे सांगितले .त्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी संबंधित नागरिकाला पतसंस्थेचे चेअरमन यांना भेटायला मुख्य कार्यालयात बोलवले. भेट झाल्यानंतर सदर कर्ज प्रकरण होणार नाही असे शाखा व्यवस्थापकाला नागरिकाच्या उपरोक्ष सांगण्यात आले होत, मात्र कर्ज होत नाही हे न सांगता संबंधित नागरिकाला तुमचे प्रकरण मी करून देतो असे सांगून त्याच्याकडून एक भल्ली मोठी रक्कम संबंधित शाखा व्यवस्थापकाने उचलली.स्वतः आर्थिक अडचणीत असतानाही संबंधित नागरिकाने सावकारी व्याजाने पैसे उचलून शाखा व्यवस्थापकाला दिले .आपले कर्ज मंजूर झाल्यानंतर सगळी देणे भागवू व नंतर येईल त्या पैशातून हळूहळू पतसंस्थेचे कर्ज भागवू या उद्देशाने संबंधित नागरिकाने पैशाची उचला उचली केली त्यानंतर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास शाखा व्यवस्थापकाने सांगितले. प्रत्येक वेळी नवीन कागद मागणी करून शाखा व्यवस्थापकाने तीन ते चार महिन्यांचा अवधी घालवला.
त्यानंतर संस्थेमार्फत नागरिकाच्या स्थावर मिळकतीची पाहणी (व्यवस्थापकाने आपल्या अधिकारात नसताना बोगस पाहणी केली,)मिळकतीचे व्हॅल्युएशन आणि सर्च रिपोर्ट ही महत्त्वाची कायदेशीर कामे झाल्यानंतर नागरिकाने कर्ज मागणीबाबत वारंवार पाठपुरावा केला असता तुमची मिळकत गहाणखत करावी लागेल असे सांगितले. गहाणखत तयार करण्यात आलं मात्र व्यवस्थापक टोलवाटोलवी करीत होता. गहाणखत करण्यासाठी संस्थेचे पत्र लागते हे मुद्रांक विक्रेत्याने सांगितल्यानंतर त्या पत्राची मागणी संबंधित नागरिकाने केली असता जवळपास एक महिना त्याला खेळवण्यात आलं त्यानंतर पत्र देण्यात आलं मात्र गहाणखत करण्यास दुय्यम निबंधक कार्यालयात संस्थेच्या वतीने शाखा व्यवस्थापक उपस्थित राहतो म्हणाला मात्र तो खेळवत होता. अखेर माझ्या अनुपस्थिती मध्ये गहाणखत करून घ्या असे सांगितले.
गहाणखत झाले, मिळकतीवर गहाणखताची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करा व त्याची पोहच दाखल करा ५०% कर्ज खात्यावर वर्ज करतो असे व्यस्थापकाने सांगितले मात्र प्रत्यक्षात गहाणखताची नोंद झाली तरी कर्ज देण्यास शाखा व्यवस्थापक नागरिकास खेळवत होता. बोजा नोंद होऊन ३ महिने उलटले तरी कर्ज मिळत नाही म्हंटल्यावर शेवटी नागरिकाने संस्थेच्या कार्यकारी मंडळ व वरिष्ठ प्रशासनास संपर्क साधला असता त्याच्या कर्ज मजुरीचा विषय आजपर्यंत संस्थेच्या कोणत्याही पदाधिकारी किंवा वरिष्ठांना माहीतच नसल्याचे समोर आले. नागरिकाने गहाणखत, मिळकतीवर चढलेली नोंद व संस्थेचे पत्र दाखवले असता असे कोणतेही ठराव संस्थेच्या बैठकीत झाले नसल्याचे समोर आले. म्हणजे संबंधित शाखा व्यवस्थापकाने सर्व कारभार बोगस केला असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत पतसंस्था कार्यकारी मंडळ व प्रशासन हात झटकत असल्याचे स्पष्ट होत असून संबंधित शाखा व्यवस्थापक मात्र अजूनही संस्थेत कामावर हजर असतो.एकूणच याबाबत प्रशासन व कार्यकारी मंडळ त्याला पाठीशी घालत आहे हे स्पष्ट होत आहे.

