सांगली : खबऱ्या प्रतिनिधी
पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात बंद पडतो. भविष्यात आता या मार्गावर हे संकट येणार नाही. आपण पुणे ते बंगळूरू नवा राष्ट्रीय महामार्ग (Pune Bangalore Highway) बांधण्याचे निश्चित केले असून ४० हजार कोटी रुपयांचा नवा रस्ता खंडाळा, फलटण, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या दुष्काळी टापूतून जाईल.
भविष्यात मुंबई पुणे रस्ता पुण्याच्या रिंगरोडला जोडल्यानंतर हाच मार्ग मुंबई ते बंगळुरू असा होईल, अशा मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज येथे केली.
पेठे ते सांगली (Sangli) या बहुचर्चित रस्त्याच्या कामाची निविदा येत्या चार महिन्यांत काढू आणि तातडीने हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना दिले. येथील नेमिनाथनगरच्या क्रीडांगणावर ‘बोरगाव ते वाटंबरे’ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे आणि सांगोला ते जत साखळी मार्गाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil), खासदार संजय पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुभाष देशमुख, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विक्रम सावंत, सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), अरुण लाड, गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar), माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील आदी व्यासपीठावर होते.
भविष्यात मुंबई पुणे रस्ता पुण्याच्या रिंगरोडला जोडल्यानंतर हाच मार्ग मुंबई ते बंगळुरू असा होईल, अशा मोठी घोषणा केली.
जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या विकासात रस्ते आण पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर लक्ष केंद्रीत केल्यास सांगली जिल्हा राज्यात अव्वल स्थानी पोहचेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने चालणारे महाराष्ट्र देशात अग्रेसर करण्यासाठीचे स्वप्न घेऊन काम करतो आहे. राज्यात पाच लाख कोटी रुपयांची कामे केली आहे. त्यात आधुनिक तंत्राचा वापर करून प्रकल्पांवरील बांधकाम खर्च कमी करणे, इलेक्ट्रीक साधनांचा वापर वाढवणे आणि वेस्ट मटेरियलचा वापर वाढवणे असे धोरण ठेवले आहे. हे करताना रस्त्यांच्या बाजूला धावणारे पाणी चालवा, चालणारे अडवा आणि अडलेले पाणी जमिनीला प्यायला लावा, असे धोरण राबवले गेले पाहिजे.
सांगली जिल्ह्यात गेल्या सात वर्षात रस्त्याची लांबी साडेतीन पटीने वाढली आहे. पैकी सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत मी नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. फुकटात शेततळी काढून देईन. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न त्यातून मिटेल. हा रस्ता ग्रीन करण्यासाठी त्यावर भरपूर झाडे लावा असेही ते म्हणाले.


