सांगली; खबऱ्या महामिडीया : नव्या सत्ताकारणात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची चांगलीच गोची झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या रिमोटवरच मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची भावना इच्छुक आमदारांत आहे.
विशेषतः माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ या दोन्ही दावेदार नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही आता शंका उत्पन्न झाली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील या आशेने सांगली जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांनी तातडीने मुंबई गाठली. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडल्याने मंत्रिपदासाठी इच्छुकांची पंचाईत झाली. फडणवीस मुख्यमंत्री असते तर मंत्रिपद खेचून आणता आले असते, आता मंत्रिमंडळ निवडण्याचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे अमित शहांकडे गेला आहे.
दरम्यान, दिल्लीतून ऐनवेळी गोपीचंद पडळकर ,तर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून खानापूर-विटा मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय आरएसएसच्या वजनदार पदाधिकार्यांशी आमदार गाडगीळ यांची असलेली जवळीकही त्यांना फलदायी ठरण्याची शक्यता आहे. नवा युवा चेहरा व मंत्रिमंडळातील सामाजिक समतोल राखण्यासाठी आ. गोपीचंद पडळकर यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोणाचे पारडे जड आहे, अशी चर्चा रंगली असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या गाडीने गेलेले, विटा खानापूर चे आमदार अनिल बाबर यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. माजी मंत्री सुरेश खाडे यांचे पारडे अधिक जड असल्याने त्यांना मंत्रिपद मिळेल, असेही स्पष्ट होत आहे.

