जत; खबऱ्या प्रतिनिधी: आसंगी (ता. जत) येथील चौघांनी जमिनी खरेदीसाठी मयत व्यक्तीच्या नावे बनावट प्रतिज्ञापत्र करून शासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मंडल अधिकारी मारुती खोत यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी किरण लक्ष्मण सावंत, राहुल लक्ष्मण सावंत, भौरव्वा लक्ष्मण सावंत व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आसंगी येथील बाबांन्ना ओंकारी सर्जे यांच्या जमिनीचा व्यवहार झाला होता. परंतु या जमिनीवर शेरा असल्याने याकरिता प्रांताधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक होते. दरम्यान, सर्जे हे मयत झालेे. असे असताना संशयितांनी परवानगीसाठी संख येथील महा-ई-सेवा केंद्रात जमीन विक्री करण्यासाठी परवानगी मिळण्याकामी मयत सर्जे या व्यक्तीच्या नावे खोटा अर्ज करून त्याखाली बनावट अंगठा केला आहे. तसेच एका अनोळखी व्यक्तीला मयत व्यक्तीच्या ठिकाणी उभा करून त्याचे प्रतिज्ञापत्र केले आहे. सदरचा प्रकार अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उमदी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.