राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी आणि दारूवरील कर कमी करण्याचे निर्णय काही दिवसांपुर्वी जाहीर केले होते. या वाईन प्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होते.
विरोधी पक्ष भाजपने देखील सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतंं. समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या निर्णया विरोधात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावरून बराच वाद पाहायला मिळाला.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, “काही ठिकाणी दारूवर ३०० टक्के कर होता. तो आम्ही १५० टक्क्यांवर आणला. कारण जे लोक दिल्लीला जायचे, ज्यांना दारूची सवय आहे, असे लोक येताना दोन्ही हातात ४-४ बाटल्या घेऊन यायचे. कारण तिथे शुल्क कमी होतं. त्यामुळे कर कमी केला, घेणारा घेतच असतो. कर कमी केल्यापासून सरकारच्या उत्पन्नात १०० कोटींवरून ३०० कोटींपर्यंत वाढ झाली आहे” असं स्पष्टीकरण अजित पवारांनी अधिवेशनात दिले.
तसेच “आपल्यावर जबाबदारी आल्यामुळे राज्याच्या हिताचा आणि उत्पन्नाचा विचार करावा लागतो त्यासाठी हे केलं, असं अजित पवार म्हणाले. “ज्या दिवशी जन्माला आलो, तेव्हापासून आजपर्यंत एका थेंबाला स्पर्श केला नाही हे सगळ्यांना माहिती आहे” असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

