मिरज : खबऱ्या प्रतिनिधी; सांगली, मिरजेसह जिल्ह्यात विविध गावांतील तब्बल एक हजार 382 जण बेपत्ता आहेत. यामध्ये 872 महिला व 515 पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध थांबला आहे.
आपल्या घरच्या व्यक्तीचा शोध लागावा, यासाठी मात्र नातेवाईकांचे पोलिस ठाण्यात हेलपाटे सुरू आहेत.
गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातून अनेकजण बेपत्ता झाले. कौटुंबिक वाद, नैराश्य, आर्थिक संकट, धमकी अशी बेपत्ता होण्याची कारणे आहेत. यातील काहीजण परतही आले. जे परत आले नाहीत, त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी खूप प्रयत्न केले. अगदी त्यांची पोस्टरही लावली. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल माहिती टाकली. अगदी बाहेरील जिल्ह्यात तसेच कर्नाटकातील बसस्थानक व रेल्वे स्थानकावर त्यांची पोस्टर चिटकवली. दुसर्या जिल्ह्यातील नातेवाईकांना भेटून शोध घेण्यासाठी विनंती केली. पण कुठेच सुगावा न लागल्याने नातेवाईकांनी संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी परिसरात चौकशी केली. दुसर्या पोलिस ठाण्यात बेपत्ता महिला व पुरुषाची माहिती फोटोसह कळविली. काही जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातून प्रतिसाद मिळाल्याने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात यश आले.
पोलिसांकडून बेपत्ता तसेच मृत व्यक्तींची ओळख न पटल्यास त्यांच्या फोटोंचे प्रदर्शन भरविले जात होते. मात्र गेल्या पाच-सहा वर्षात अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले नाही. या प्रदर्शनात राज्यातील सर्व पोलिस ठाण्यातील बेपत्ता व मृत व्यक्तींचे फोटो असायचे. यातून आपल्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्ती दुसर्या जिल्ह्यात सापडल्याचे उघडकीस आले आहे. मृतांचीही ओळख पटण्यास मदत झाली आहे. अशाप्रकारचे प्रदर्शन भरविण्याची माहिती प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध केली जात असल्याने विविध जिल्ह्यातील लोकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. पोलिसांनी असे प्रदर्शन भरविले तर दाखल बेपत्ता व्यक्तींचा ठावठिकाणा उघडकीस आणण्यात मदत मिळणार आहे.

सात वर्षांनंतर केले जाते मृत घोषित!
एखाद्या बेपत्ता व्यक्तीचा शोध नाही लागला, तर त्याला सात वर्षांनंतर न्यायालयाकडून मृत घोषित केले जाते. संबंधित बेपत्ता व्यक्तीचा वारसा हक्क मिळविण्यासाठी नातेवाईकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागतो. तिथे पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीची कॉपी देऊन न्यायालयाकडून मृत घोषित झाल्याचे प्रमाणपत्र घेतले जाते.
बेपत्तांची यादी वाढतच निघालीय!
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पुरुष व महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतच आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील आकडेवारी कधीच कमी झालेली दिसत नाही. जिल्ह्यात अजूनही 1 हजार 387 जण बेपत्ता असल्याची नोंद स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागात आहे. यामध्ये 872 महिला व 515 पुरुषांचा समावेश आहे.

