तासगाव : अमोल पाटील
तासगाव शहरातून पुणदीकडे जाणार किलोमीटरभराचा रस्ता तसेच आरवडे स्टँड ते स्मशानभूमी हा सांगली – आटपाडी महामार्गावरील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याकडे सबंधित प्रशासन आणि ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांनी तासगाव आणि आरवडेजवळील रस्त्यावरून गाडी चालवून दाखवावी व आपली हाडे खिळखिळी करून घ्यावीत, असे खुले आव्हान प्रवाशांनी दिले आहे.
नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील वजनदार मंत्री. देशभरातील रस्ते, महामार्गाच्या कामात त्यांनी मोठे काम केले आहे. देशभरात रस्त्यांचे जाळे उभारण्यात त्यांची गती पाहून त्यांना ‘रोडकरी’ असे म्हटले जाते. समृद्धी महामार्गासारखे अनेक मार्ग त्यांनी अल्पावधीत पूर्ण केले आहेत. कामाच्या गुणवत्तेबाबत ते नेहमी ठेकेदारांना तंबी देत असतात. एका महामार्गाची टेस्ट ड्राइव्ह घेत असताना त्यांनी 150 च्या गतीने गाडी चालवताना थर्मासमधील चहा काढून तो मी पिणार. एक थेंब जरी चहा खाली पडला तरी रुपयाही मिळणार नाही, असा दम ठेकेदाराला दिला होता. ही टेस्ट ड्राइव्ह त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली होती. सांगण्याचा मुद्दा हाच की, गडकरींना रस्त्याच्या कामाच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा चालत नाही. त्यांचा ठेकेदार व प्रशासनावर धाकही तेवढाच आहे.
तासगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार व सबंधित प्रशासनाला मात्र गडकरींचा अजिबात धाक वाटत नसल्याचे चित्र आहे. तासगाव शहरात तर पुणदी रस्त्याचे काम कासवापेक्षाही धिम्या गतीने सुरू आहे. नगरपालिकेच्या अखत्यारीत सुरू असणारे हे काम अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. रस्त्याची एक बाजू झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. ज्या बाजूचे काम पूर्ण झाले आहे ती बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा दीड ते दोन फूट उंचावर आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अर्धवट अवस्थेत रखडलेल्या या कामाकडे ठेकेदार आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
दुसरीकडे याच महामार्गावर आरवडेजवळ 200 ते 300 मीटरचा रस्ताही रखडला आहे. इथेही मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याठिकाणी गाड्या चालवताना कसरत करावी लागते. आरवडे ते टोप या महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्त्याचे हे काम रखडले आहे. आता तर या ठेकेदाराचे कामगार पळून गेल्याने हे काम कधी पूर्ण होणार, याबाबत चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तर झोपेत आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे पडूनही या विभागाला जाग येत नाही. साधे खड्डे भरून घेण्याची तसदीही हा विभाग घेत नाही.
याठिकाणी अनेक छोटे – मोठे अपघात झाले आहेत. मात्र पीडब्ल्यूडीला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसते. बहुदा गडकरींची त्यांना भीतीच राहिली नाही. त्यामुळेच हा विभाग निर्ढावला आहे. प्रवाशांच्या जीवाशी ठेकेदार व प्रशासनाचा खेळ सुरू आहे.
आता गडकरी उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनीच जरा जिल्ह्यातील ठेकेदारांना व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कान उपटावेत, अशी मागणी होत आहे. शिवाय तासगाव शहर ते पुणदी रोडवरील किलोमीटरभराचा रस्ता व आरवडेजवळील 200 ते 300 मीटरच्या रस्त्यावर गडकरींनी 150 च्या राहूदे पण किमान 10 – 20 च्या वेगाने तरी गाडी चालवून दाखवावी, असे खुले आव्हान प्रवाशांनी दिले आहेत. प्रवाशी रोज या रस्त्यावरून आपली हाडे खिळखिळी करून घेत आहेत. गडकरींनीही उद्या या रस्त्यावर गाडी चालवून आपली हाडे खिळखिळी करून घ्यावीत, असा टोला प्रवाशांनी लगावला आहे.