नाशिक, 05 जून : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी पुन्हा एकदा खालच्या भाषेत टीका केली आहे.
त्यांच्या या टीकेमुळे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. नाशिकमध्ये सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषद भरवली होती. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. ‘दोन वर्षापूर्वी विश्वासघातानी आम्ही विरोधी पक्षात बसलो.
विरोधीपक्षामध्ये असलो तरी रडत बसलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत. इतके वर्ष कांद्याचा प्रश्न का मिटले नाहीत. याच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना गोळ्या घालण्यात आले होते.
त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या XXXवर लाथ घाला असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास दाखवा ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असं वादग्रस्त विधान पडळकर यांनी केलं. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाचे पालन करणार का? उद्धव ठाकरे सध्या रिमोट कंट्रोलवर काम करत आहेत, अशी टीकाही पडळकरांनी केली.

