तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी; तासगाव तालुक्यातील येरळा नदीपात्रातील बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या पथकाच्या गाडीला अपघात झाला. दारू पिऊन तर्र असणाऱ्या या तलाठ्याची दुचाकी थेट बाभळीच्या झाडात घुसली. यामध्ये एक तलाठी व एक झिरो तलाठी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, गस्तीला गेल्यानंतर दारू पिऊन आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी सबंधितांना खडे बोल सुनावले आहेत. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या प्रकाराची शहरभर चर्चा आहे.
तालुक्यातील येरळा व अग्रणी नदीपात्रातून बेसुमार वाळूचा उपसा होत आहे. काळ्या सोन्याची होणारी ही लूट थांबवण्यासाठी तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी तलाठी, मंडल अधिकारी व कोतवाल यांची पथके तयार केली आहेत. या पथकांवर वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी असते. मात्र ही पथके कमालीची कामचुकार आहेत. या पथकांमधील अनेकजण तर अट्टल बेवडे आहेत. बऱ्याचवेळा वाळू चोरी रोखण्यासाठी बाहेर पडलेल्या या पथकांमधील अनेकजण दारू पिऊन टल्ली झालेले असतात. काहीजण तर वाळू तस्करांकडूनच मिळालेल्या पैशातून दारू आणि मटणाची पार्टी झोडत बसलेले असतात. त्यामुळेच वाळू चोरी रोखण्याच्या प्रयत्नांना आजतागायत यश आले नाही.
शुक्रवारी रात्री मणेराजुरीच्या मंडल अधिकारी राजश्री सानप यांच्या नेतृत्वाखाली संतोष शिंदे (हातनूर तलाठी), शरद गुरव (जरंडी तलाठी), सतीश कुंभार (तुरची तलाठी), तानाजी फराकट्टे (आरवडे तलाठी), बाळासो मुजावर (सावर्डे कोतवाल) व विजय देशमुख (जरंडी कोतवाल) यांच्यावर वाळू चोरी रोखण्यासाठी नदीकाठावर गस्त घालण्याची जबाबदारी होती. यातील काहीजण तहसीलदार रांजणे यांच्या आदेशानुसार गस्तीस आले होते. तर काहींनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत कामचुकारपणा केला होता.
यातील तुरचीचे तलाठी सतीश कुंभार,जरंडीचे तलाठी शरद गुरव, आरवडेचे तलाठी तानाजी फराकट्टे व तुरची येथील झिरो तलाठी पोपट पोतदार शुक्रवारी रात्री ड्युटीवर होते. यातील अनेकजण दारू ढोसून तर्र झाले होते. तासगावातील येरळा काठावरील तिकाटण्याजवळ बेधुंद अवस्थेत जात असताना तलाठी सतीश कुंभार यांच्या दुचाकी गाडीला अपघात झाला. ही गाडी रस्त्याकडेच्या एका फलकला थटून बाभळीच्या झाडात घुसली. या अपघातात गाडीची मोडतोड झाली आहे. तर कुंभार व पोतदार किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची घटना समजताच तहसीलदार रवींद्र रांजणे, तासगावचे तलाठी पतंग माने यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. याठिकाणी तलाठ्याचा अवतार बघून रांजणे भलतेच भडकले. दारू ढोसून गस्तीस गेल्याने त्यांनी तलाठ्यांवर जाळ काढला. दरम्यान, आता बेवड्या तलाठ्यांवर प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे. दारू पिऊन कर्तव्यावर असणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशा बेवड्या तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित आहे. याप्रकरणात तहसीलदार रांजणे कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वाळू चोरी रोखणे, ही काळाची गरज आहे. तहसीलदार रांजणे हे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र तलाठ्यांचे त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नाही. जर बेवडे तलाठी वाळू चोरी रोखायला गेले तर वाळू तस्करांना लगाम घालणे अवघड आहे. त्यामुळे रात्री गस्तीला गेल्यावर रंगात येणाऱ्या तलाठ्यांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.
सतीश कुंभार यांना इनोव्हा गाडीतून सांगलीला सोडले…!
तुरचीचे तलाठी सतीश कुंभार हे सांगलीला रहायला असतात. शुक्रवारी रात्री दारू ढोसून ते नदीकाठावर गस्त घालायला आले होते. त्याठिकाणी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना इनोव्हा गाडीतून सांगलीला सोडण्यात आले.
झिरो तलाठी पोपट पोतदार यांना सरकारी पाहुणचार…!
अनेक तलाठी कार्यालयात झिरो तलाठी कार्यरत आहेत. तुरची येथील कार्यालयातही पोपट पोतदार हा झिरो तलाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे. शुक्रवारी रात्री ते तलाठी कुंभार यांच्यासोबत नदीकाठाला गस्त घालायला आले होते. मात्र याठिकाणी कुंभार यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात कुंभार व पोतदार हे किरकोळ जखमी झाले. उपचारानंतर कुंभार याना इनोव्हा गाडीतून तर पोतदार यांना चक्क सरकारी गाडीतून घरी सोडण्यात आले.