मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; मिरज तालुक्यातील वड्डी येथे ग्रामपंचायतीने महावितरणचे थकित देयक न भरल्यामुळे गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विजेचा महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून परिसरातील ग्रामस्थ विविध भागांमधून पाणी आणून वापरत होते. यामुळे दूषित व अस्वच्छ पाण्याचा वापर परिसरातील नागरिक करत होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून पाठपुरावा करूनही दखल घेतली नसल्याने आज या भागातील महिलांनी ग्रामपंचायतीकडे मोर्चा वळवून ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून परिसरामध्ये पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. जनआक्रोश आज दिसून आला. शनिवारी दुपारी ग्रामपंचायतीकडे मोर्चा वळवून राजीव गांधीनगर व परिसरातील महिलांनी ग्रामपंचायतीला घेराव करून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू दिली जाणार नाही असा पवित्रा यावेळी महिलांनी घेतला आहे.