म्हैसाळमध्ये झालेल्या स्त्रीभ्रूण हत्याकांडाविषयी सर्व माहिती घेतली असून, त्यातील दोषींना शिक्षा होण्यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी ग्वाही शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात विशाखा समित्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी या समित्या प्रभावी कार्य करीत असल्याचेही त्या म्हणाल्या.
मनीषा कायंदे यांच्यासह आमदारांची समिती सांगली जिल्ह्याच्या दौऱयावर आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, कुपवाड शहरप्रमुख अमोल पाटील, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, सुनीता मोरे व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदार कायंदे म्हणाल्या, ‘महिला अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात विशाखा समिती स्थापन करण्याचे निर्देश आहेत. त्याचा आढावा समितीने घेतला आहे. सांगली जिल्ह्यात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. तसेच वनविभागातील उपवनसंरक्षकाने महिला अधिकाऱयाचा विनयभंग केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचीही सविस्तर माहिती घेतली आहे. याचा तपास पोलिसांकडून केला जाईल. म्हैसाळ येथे झालेल्या स्त्रीभ्रूण हत्याकांडाच्या विषयात थोडी दिरंगाई झाली. याचीही आम्ही पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली. जिह्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. मात्र, गुन्ह्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहेत. कोरोना काळातील विधवा झालेल्या बहुतांश महिलांना अनुदानही पोहोचले आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेनेची महिला आघाडी सक्षमपणे कार्यरत असून, शिवसेनेचे प्रत्येक काम तळागाळापर्यंत पोहचवले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.