इस्लामपूर: खबऱ्या प्रतिनिधी; इस्लामपूर शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारे 40 विद्युत पोल व दोन डीपी स्थलांतरित करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
हे पोल स्थलांतरित केल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले. शहरातील संभाजी चौक, पोस्ट कार्यालय, अंबिका उद्यान, मुस्लिम दफनभूमी आदी परिसर रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत होता. शिवाय या खांबांचा आडोसा घेवून या ठिकाणी वाहनांचे पार्किंगही होत होते. त्यामुळे नगरपालिकेने अशा अडथळा ठरणार्या विद्युत पोलचा सर्व्हे केला होता.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत हे पोल स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाले आहे. पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या सहकार्यामुळे हे काम सुरू होत असल्याचे मुख्याधिकारी साबळे यांनी सांगितले. यामुळे प्रमुख मार्ग मोकळे होवून वाहतुकीची कोंडीही कमी होणार आहे. विद्युत अभियंता अनिकेत हेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.

