बुलढाणा : खबऱ्या प्रतिनिधी ; आज शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे जळगाव जामोद – संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौऱ्यात उशीर झाल्याने व जवळपास दुपारचे अडीच वाजल्याने मंत्री महोदयाना भूक लागली.यावेळी त्यांच्या बंदोबस्तात असलेल्या ठाणेदार महोदयांच्या डब्यावर बच्चू कडू यांची नजर पडली आणि क्षणार्धात बच्चू कडू यांनी त्यांच्या गाडीतील तो डबा आपल्या हाताने काढून ठाणेदारांना विचारलं यात काय आहे..? त्यावेळी ठाणेदारांनी म्हटलं माझा डबा आहे आणि साधं जेवण आहे. बच्चू कडू यांनी तात्काळ ठाणेदारांना म्हटलं तुम्ही हॉटेलवर जेवा तुमचा डबा मी जेवणार आज….आणि जवळच असलेल्या संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डब्यातील साधं भाकरी आणि भाजी , मिरचीचा ठेचा हे जेवण केलं. यावेळी पुन्हा एकदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचा साधेपणा समोर आला.
बच्चू कडूंचा साधेपणा आणि नेहमी चर्चेत असणे…!
बच्चू कडू हे अत्यंत साध्या गरीब कुटुंबातील असल्याने त्यांचं राहणीमान नेहमी कायम साधे आहे. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी जुळलेले असतात. त्यामुळे ते कधीही स्वतःला राज्यमंत्री म्हणून वावरत नाहीत , बिनधास्त राहणीमान ही त्यांची ओळख आहे.म्हणून त्यांनी कधीही बडेजावपणा केला नाही , त्यांचा साधेपणाचा प्रत्यय नेहमी येत असतो. विशेषतः ते कुठल्याही दौऱ्यावर असताना कधी शेतात दगड मारून बोर तोडणे , कधी शेतकाऱ्यांसोबत बांधावर जेवण करणे आणि त्यांच्या या साधेपणाची मग नेहमी चर्चा होत असते.
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्य मंत्री झाल्यानंतरही बच्चू कडू यांच्यातील हा वेगळेपणा आजही कायम आहे. बच्चू कडू हे त्यांच्या हटके शैलीबद्दल राज्यभरात प्रसिद्ध आहेत. या आधीही त्यांनी शेतकरी, दिव्यांग, कामगार आणि तळगाळातील कार्यकर्त्यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला आहे.
कडक शब्दात कान उघाडणी
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे प्रशासकीय आढावा बैठकीत भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.आढावा घेत असताना त्यांना अनेक बाबी सांगता आल्या नाहीत,एवढेच काय तर गोर गरीब जनतेसाठी त्यांनी अनेक योजना राबवलेल्या नाही हे लक्षात आल्यावर बच्चू कडू यांचा संताप चांगलाच अनावर झाला. यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.गरीब जनतेचे काम न करणाऱ्या तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,तुम्हाला लाथा घातल्या पाहिजेत अशा शब्दात बच्चू कडू यांनी राग व्यक्त केला.