नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मुखपत्राने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या तिकीट वाटप निकषांवर एक सूचक ट्विट करून नवीच चर्चा सुरू करून दिली. ‘‘२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा नवा फॉर्म्यूला – ७० वर्षांपुढील उमेदवारांना तिकीटे नाहीत” असे ट्विट पांचजन्यने केले. या नव्या फॉर्म्यूल्यानुसार, खासदार गिरीश बापट आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे तिकीट कापणार का, असा प्रश्न विचाण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून २०१४ मध्ये काल (गुरुवारी ) प्रथम सूत्रे हाती घेतली. तेव्हापासूनच्या ८ वर्षांतील मोदी सरकारच्या योजनांचा गौरव करण्यासाठीचा सोहळा भारतीय जनता पक्षाने सुरू केला. स्वतः मोदींनी मात्र आजच्या दिवशी तेलंगणाला भेट देण्याची योजना आखली. अनेक केंद्रीय मंत्री दाक्षिणात्य राज्यांत गेले आहेत.
२०२४ चा रोडमॅप आखताना ‘टीम मोदी‘ चे लक्ष्य ‘पुन्हा एकदा दक्षिण भारत’ हे असणार हेही अधोरेखित झाले. याच दरम्यान संघाच्या मुखपत्रातून २०२४ साठी तिकीट देताना भाजप ७० ची वयोमर्यादा पाळणार, असे सूचक ट्विट करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला. कारण तसे सूत्र खरेच ठरले तर ? स्वतः मोदीच निवडणूक राजकारणातून बाद होतात, मग भाजपचे २०२४ मध्ये काय आणी कसे होणार, हा भाजप जणांना व्याकूळ करणारा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दुसऱयांदा सत्ता मिळविली व २०२४ मध्येही वातावरण मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला अनुकूल आहे, असे भाजप नेते छातीठोकपणे सांगतात. २०१९ मध्ये मोदींचा दुसऱयांदा शपथविधी झाला. त्या ३० मे पर्यंत (सोमवार) भाजपचा हा अष्टवर्ष पूर्ती सोहळा सुरू राहील. मात्र या ८ वर्षांत त्याच भाजपला कर्नाटक वगळता दक्षिण भारताने (विंध्याचलाच्या खालचा पट्टा) साफ व वारंवार नाकारले आहे हे वास्तव.
राजकीय तज्ज्ञांच्या मते तमिळनाडू,आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांत भाजपची पाटी कोरीच रहाते. त्यामागे भाजप नेतृत्वाची ‘अंग्रेजी में हाथ तंग’ ही सकृतदर्शनी वस्तुस्थिती असली तरी दाक्षिणात्य राज्ये व पश्चिम बंगालसारखी राज्ये मुळात पुरोगामी विचारसरणीची आहेत व भाजपच्या ‘मूळ’ विचारसरणीला येथील जनता मुळापासून स्वीकारत नाही याची जाणीवही भाजप व त्यांच्या मातृसंस्थेला आहे. त्यामुळेच संघाने केरळमध्ये व भाजपने बंगालमध्ये विस्तार करण्याचे प्रयत्न चिकाटीने सुरू ठेवले आहेत. बंगालमध्ये त्याला काही प्रमाणात यश आले असले तरी केरळसह अन्य दाक्षिणात्य राज्ये भाजपला थारा देत नाहीत. त्यामुळे मोदींनी २६ जानेवारीच्या मुहूर्तावर तेलंगणा गाठून भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.
गिरीश बापट, रावसाहेब दानवेंचे तिकीट कापणार ?
वाजपेयी, गांधी यांच्या विरोधात लढणारी व्यक्ती राज्यसभेच्या रिंगणात ; ही २३० वी निवडणूक
तमिळनाडूसह अन्य राज्यांतही केंद्राच्या अनेक विकासयोजनांच्या उद्घाटनाचा मुहूर्त कालपासून करण्यात येत आहे. रेल्वे व अन्य योजनांच्या उद्घाटनांसाठी केंद्रीय मंत्र्यांना दक्षिणेत पाठविण्यात आले आहे. भाजप मंत्री व खासदारांच्या ‘मतदारसंघ प्रवास’ योजनेतही दाक्षिणात्य राज्यांवर जोर देण्यात आला आहे. २०२४ पर्यंत दाक्षिणात्य राज्यांतील जनाधार विस्तारण्याची महत्वाकांक्षी योजना भाजपने आखली आहे.
२०२४ मध्ये मोदी ७४ वर्षांचे होतील..
‘‘२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा नवा फॉर्म्यूला – ७० वर्षांपुढील उमेदवारांना तिकीटे नाहीत’ असे ट्विट पांचजन्य ने केले. संघाच्या मुखपत्राच्या अधिकृत हॅंडलवरून केलेले हे ट्विट प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे. कारण संघाने यापूर्वी ७५ वर्षांपुढील नेते सक्रिय राजकारणातून बाद, हे सूत्र ठरवल्यावर भाजपने पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यापासून माजी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक दिग्गजांना २०१९ मध्ये घरी बसविले होते. आता ही वयोमर्यादा ७० पर्यंत घटविण्यात येणार असली तर त्या अटीनुसार राजनाथसिंह यांच्यासह अनेक भाजप नेते बाद होतातच, पण सर्वांत लक्षणीय म्हणजे भाजप ज्यांच्या चेहऱ्यावर विजयामागून विजय मिळवत चालला आहे ते स्वतः नरेंद्र मोदी हे आताच सत्तरीपार आहेत. २०२४ मध्ये मोदी ७४ वर्षांचे होतील. साहजिकच संघाच्या दिशेने आलेल्या या ‘गुगली’ची जोरदार चर्चा आहे. पांचजन्य हे संघाचे मुखपत्रच नाही, असा खुलासा अद्याप आलेला नाही.