देशात सध्या ज्ञानवापी मशिद तसेच कुतुबमिनार या इमारतीवरून नवे वाद सुरु असतानाच महाराष्ट्रातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत मोठा दावा केला आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचे विहार होते, तसेच हे मंदिर पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करा, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे.
विठ्ठल मंदिरातील भिंतींवर आजही भगवान बुद्धांच्या मुर्ती असल्याचा दावा त्यांनी केला आहे, इतकेच नाहीत तर ‘बालाजी मंदीर, जगन्नाथपुरीसह अनेक मंदिरात पूर्वी बौद्ध विहार असल्याचा दावा त्यांनी केलाय, सोबतच ही मंदिरं पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करा अशी मागणी बौद्ध अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचे विहार होते, आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मुर्ती आहेत, यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरूपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती, आमची विहारं पाडून मंदिरं आणि मस्जिद बनवली असा आरोप यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे.
“संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरं ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केलंय, प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या” असा दावाही डॉ. आगलावे यांनी केला आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीबाबत देखील असाच वाद सुरू आहे. उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील फास्टट्रॅक कोर्टाकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्या कोर्टाकडे हस्तांतरीत केलं. पण सध्या न्यायाधीश उपलब्ध नसल्यानं या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे.