रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत काल सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे ‘जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ या यात्रेच्या सांगता सभेत उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे या सभेत जाहीर कौतूक केले आहे.
सदाभाऊ खोत सभेत बोलताना म्हणाले, सदाभाऊ खोत यांना आता आमदारकी हवी आहे म्हणून ते सभा घेतात, अशी विरोधी पक्ष टीका करतात. पण, 30 वर्ष हा पठ्ठ्या चळवळीमध्ये काम करत होता. अनेक वेळा तुरुंगात गेलो, बाहेर आलो. आम्ही आमदारकीसाठी जन्माला आलेलो नाही.
आमचा जीव आमदारकीमध्ये नाही तर आमचा जीव सामान्य माणसांमध्ये आहे. काय करायची आहे ती आमदारकी, खासदारकी. पण झालो मी, त्यानंतर गोपीचंद पडळकर आमदार झाले. महादेव जानकर मंत्री झाले, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी आपला लढा आमदारकीसाठी नसल्याचे म्हणतं विरोधकांना प्रतिउत्तर दिले.
तसेच म्हणाले, मी पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत काम करणारा मुख्यमंत्री बघितला आहे. आताचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करतात आणि म्हणतात, जायचं काय काम आहे? अखंड महाराष्ट्र मला इथे दिसतोय. त्यामुळे आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कर्तबगार माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आणायचा आहे, असे खोत म्हणाले.
आमचे गमावयाला काय नाही आणि कमवायला काही नाही. मी चळवळीत होतो तेव्हा पैसे मागून पुढच्या गावाला जायचो. त्यातुन राहिलेल्या पैशांमधून घर चालायचं. हळू हळू देवेंद्र फडणवीसांसोबत आलो. त्यांनी आमदार केले. त्यांच्यामुळे आज सातवी नापास गडी दिड लाख पगार घेतोय, असे खोत म्हणाले.
आता आम्हाला मरेपर्यंत पेन्शन आहे. एसटी फुकट आहे. आता मरेपर्यंत फडणवीस यांनी आमची सोय केली, आता आम्ही मरेपर्यंत त्यांच्यासोबत आहे. खंद्याला खंदा लावून त्यांच्या बाजूने लढणार. पडळकर, मी, दरेकर आमच्यासारखी फाटकी माणसं फडणवीस यांच्यासोबत आहेत. आमच्यावर जबाबदारी द्या भल्या-भल्यांना लोळवल्याशिवाय राहणार नाही, असेही खोत म्हणाले.