राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने आणखी एक जागा लढविण्याचाही निर्णय घेतला आहे. तर, संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अपक्ष आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आठ अपक्ष आमदार उपस्थित होते, अशा माहिती मिळतेय.
राज्यमंत्री बच्चू कडू, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर , आमदार आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडे , किशोर जोरगेवार, विनोद अग्रवाल , मंजुळा गावित आणि गीता जैन हे आमदार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राज्यसभा उमेदवारीबाबत विचार विनिमय करण्यात आला.यातील बऱ्याच आमदारांनी संभाजीराजे किंवा अन्य बाहेरच्या उमेदवारास संधी देण्यापेक्षा शिवसेनेतीलच नेत्यांना संधी द्या. आपण जो निर्णय घ्याल त्यासोबत आम्ही राहू असे सांगितल्याची माहिती मिळतेय. चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही नवे चर्चेत पुढे आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आपली भेट घेतली. यावेळी ‘आधी शिवबंधन बांधा, मगच उमेदवारी देण्याबाबत विचार करू’ असे सांगितले अशी माहिती मुख्यमंत्री यांनीच दिल्याचे सूत्रांनी सांगितले. संभाजीराजे यांनी वाटल्यास समर्थकांशी चर्चा करावी आणि आपला निर्णय कळवावा. यासाठी दोन दिवस वाट पाहू, असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले असे या सूत्रांनी सांगितले. संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला तर शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे किंवा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल असेही या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेचा दिल्ली दरबारातील हुकमी एक्का संजय राऊत यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. संजय राऊत यांनी भाजपविरोधी उघडलेली आघाडी शिवसेनेच्या पथ्यावर पडत आहे. संजय राऊत हे तीन वेळा राज्यसभा सदस्य झाले आहेत. आता त्यांना चवथ्यांदा संधी दिली जात असून २६ मे रोजी ते उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता आहे.