सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
त्यातच आता काॅंग्रेस आमदारानं देखील सरकारला घरचा आहेर दिलाय. सोलापूरचं (Solapur) पाणी पळविण्याचा प्रयत्न केला, तर रान पेटवू असा इशारा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सरकारला (Maharashtra Government) दिलाय. मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय, असंही आमदार शिंदेंनी स्पष्ट केलंय. उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणी इंदापूर आणि बारामतीला देण्याच्या प्रश्नावर आमदार शिंदेंनी माध्यमांपुढं आपली भूमिका स्पष्ट केलीय.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘उजनीचे पाणी 20 वर्षांपूर्वी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी पाईपलाइनद्वारे सोलापूरला आणलं. आता उजनी प्लस असूनही महापालिकेतून याचं नियोजन होत नाहीय. कॉंग्रेस सत्तेत असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होतं. तेव्हा उजनी मायनसमध्ये होतं, तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दोन कोटी रुपये खर्च करुन सक्शन पंप लावून रात्रीत पाणी आणलं.’
दुष्काळ पडल्यानंतर देखील आम्ही हद्दवाढ भागातही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. आता उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडं वळवण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही काय मेलो का? मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय. सोलापूरकरांचं पाणी वळवत असाल तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार शिंदेंनी सरकारला दिलाय.

