मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; मिरजेतील दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयामध्ये शनिवार दि. २८ मे रोजी “समकालीन समाजात सामाजिक शास्त्रांची भूमिका” या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शारीरिक शिक्षण, राज्यशास्त्र व भूगोल या विभागांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उदघाटन व बिजभाषण जेष्ठ समाजशास्त्रज्ञ व डॉ. बा. आ. मराठवाडा विद्यापीठाच्या माजी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता अवचार यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक गोखले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या संपूर्ण दिवसभरात दोन सत्रामध्ये तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व एका सत्रात शोधनिबंधांचे वाचन होणार आहे. गव्हर्नमेंट कॉलेज, खांडोळा (गोवा) येथील प्रोफेसर डॉ. प्रबीर कुमार रथ हे पहिल्या सत्राचे तज्ञ मार्गदर्शक आहेत. दुसऱ्या सत्रात साधक व्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष तथा महावीर महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. भरत नाईक यांचे मार्गदर्शन होईल. तिसरे सत्र शोधनिबंध सादरीकरणाचे आहे.
या सत्रामध्ये परिषदेसाठी आलेल्या शोधनिबंधातून काही निवडक शोधनिबंध संशोधकांना वाचता येतील. संस्थेचे कार्यवाह श्री. राजू झाडबुके हे समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे आहेत.
समाज, संस्कृती व मानवी जीवनाला कलाटणी देणाचे काम सामाजिक शास्त्रे करतात. काळानुरूप सामाजिक शास्त्रांचे स्वरूप जरी बदलत चालले असले तरी समकालीन काळात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हीच भूमिका जाणून घेण्याच्या आणि त्याबाबत यथोचित चर्चा करण्याच्या हेतूने सदरचा बीजविषय निवडण्यात आला आहे. या बिजविषयास अनुसरून महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकाकडून शोधनिबंध मागविण्यात आलेले आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शोधनिबंध पाठवण्याची अंतिम तारीख 22 मे पर्यंत आहे. स्वीकारले गेलेले शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवरील रिसर्च जर्नलमध्ये छापण्यात येणार आहेत.
या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व स्वागताध्यक्ष डॉ. शर्वरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या संयोजिका सौ. सुजाता आवटी, संयोजन समिती सदस्य डॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रा. विनायक वनमोरे, प्रा. गंगाधर चव्हाण, प्रा. रमेश कट्टीमणी, प्रा. बाबासाहेब सरगर, डॉ. शबाना हळंगळी, प्रा. संतोष शेळके, डॉ. विनायक पवार हे सातत्याने काम करत आहेत. जास्तीत जास्त प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांनी या परिषदेसाठी शोधनिबंध पाठवावेत व परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे.