गोपनीय खबऱ्या विशेष / संपादकीय..
कायदा सुव्यवस्था ढासळणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर कुणी काय द्यावे हा ज्याच्या त्याच्या हेतूचा आणि हित संबंधाचा विषय असला तरी कुणी सांगितले म्हणून कायदा सुव्यवस्था रसातळाला जाते किंवा सुधारते असे अजिबात नाही. कायदा सुव्यवस्था प्रत्यक्षात नागरिकांना स्पर्श करते, त्या स्पर्शातून ज्या भावना, संवेदना उठतात ती असते कायदा सुव्यवस्थेची वस्तुस्थिती. या निकषावर सांगली जिल्हा पोलीस दलाची कायदा सुव्यवस्था हाताळण्यात सपशेल पराभूत झाली आहे.पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी खांद्यावर घेतली तेव्हा या व्यक्तिमत्वाची कार्यपद्धती अन्य पोलिस अधिकाऱ्यांपेक्षा हटके आहे, याची चुणूक त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मिळाली होती. त्यावरून बवालही झाला. प्रसार माध्यमांनी या आयपीएस अधिकाऱ्यालाच आयपीसीचे धडे देण्यास सुरुवात केली. मात्र ध्येयाने प्रेरित असलेले लोक वेडे असतात. हे इतिहास सांगतो. हे दगड, शेण, अंड्यांचा मारा सोसूनही ध्येयापासून विचलीत होत नाहीत तिथं अलीकडच्या उसण्या शब्दांच्या माराला भीक घालतील ते ध्येयवेडे आयपीएस कसले..? आपला हट्ट पुर्ण करूनच पोलिस अधीक्षक थांबणार..?

दरम्यानच्या काळात कर्नाटकातील रक्तचंदन चोर पुष्पा प्रकरणासारख्या काही गुन्ह्यांचा तपास , आंतरराज्य दरोडेखोरांची टोळी विटा पोलिसांकडून ताब्यात घेणे असो किंवा अन्य प्रकरणांचा तपास सांगली पोलिसांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यास प्रवृत्त करीत असला तरी पत्रकारांच्यावरील हल्ले आणि समाजात वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यात आलेले अपयश हे कर्तृत्व झाकोळून टाकते. दिवसाढवळ्या होणारे खून, वास्तववादी प्रश्नांवर पत्रकारांनी उठवलेला आवाज अन तो दाबण्यासाठी धमकी, हल्ल्यांचा होणारा प्रयत्न, आई -बापाने आयुष्यभर काबाडकष्ट करून कमावलेली घामाची मिळकत एका रात्रीत मुलांकडून विट्याच्या डान्सबार मधील बारबालांसमोर धुवून टाकण्याचा उपदव्याप यासारखे असंख्य प्रकार जिल्ह्यात सतत घडत आहेत. असे प्रकार शंभर टक्के थांबवणे कुठल्याच पोलिस यंत्रणेला शक्य नाही, याची जाणीव आम्हालाही आहे. त्याचे कारण शुद्ध पाण्या इतके पारदर्शक आहे.

प्रत्येक घराला पहारा द्यावा एवढे मनुष्य बळ पोलिस यंत्रणेकडे नाही. हे मान्यच करावे लागेल. इथेही कायदा सुव्यवस्था ढासळली असा सरसकट आरोप करून नागरिकांनाही आपली जबाबदारी झटकता येणार नाही. पोलिसांनी ‘शेजारी खरा पहारेकरी” ही थिम नजरेआड केली असली तरी “माझे घर माझी जबाबदारी” ही थिम स्वतःच राबविण्यास पुढाकार घ्यायला निर्बंध थोडाच लादलाय ? राहिला प्रश्न रात्रीच्या गस्तीचा. किती ताण सोसायला लावणार ? रात्र थोडी सोंग फार. कुठे कुठे लक्ष देणार ? शहर हद्दी लगतचे ढाबे पाहायचे, शहरातील लॉजिंग तपासायचे, रस्त्यावर धावणारी वाहने अडवायची? एक तर आधीच मनुष्य बळ कमी, म्हणून अवैध धंद्यावर धाडी टाकायला फुरसत नाही म्हणून अवैध धंदे चालकांना निरोप धाडून गुन्हे अंगावर घेणारे पोलिस ठाण्यात बोलावून घेत छापा टाकल्याची कारवाई केली, असे दाखविण्याची नामुष्की ओढवली.असो.
सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांकडून उच्च पातळीवर तडीपारीच्या कारवायाही जोरात सुरु आहेत. त्याबद्दल जिल्हा पोलिस प्रशासन धन्यवादास पात्र आहेच. मात्र एवढ्यावर सांगलीकर समाधानी नाहीत. अपेक्षित सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात पोलिस अद्यापही यशस्वी ठरलेले दिसत नाहीत. पत्रकारांवर, सामान्यांवर हल्ले करत कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या
झुंडी समोर दिसत असतांना कुठला नागरिक स्वतःला सुरक्षित मानेल ? सांगली जिल्ह्यातील नागरिकांना तुमच्या अवैध धंद्याशी असलेल्या हित संबंधांचे कुठलेच देणे घेणे नाही. लख लाभ होवो! कुठलाच राग ,रोष नाही. हे वरवर नाही तर मनापासून सांगलीकरांच्या त्याच भावना आहेत. अलीकडच्या काळात, हे लागेबांधे तुटावेत म्हणून केलंय का सांगलीकरांनी आंदोलन? नाही ना. दारू मटका गांजा, क्लब, कसिनो वाटल्यास डान्सबार सुद्धा होऊ दया. अजून पाहिजे तर काही गोष्टींचे ठेके लावा, जिल्ह्यातील काही शहरामधील उच्चभ्रूचे विकृत चोचले पुरविणारे मसाज पार्लर खुलेआम चालू द्या, हवे तर मनोरंजनाच्या , सांस्कृतिक कला केंद्रांच्या नावाखाली क्लब आणि आलिशान ललनागिरीला परवानगी द्या, हेल्मेट सक्ती करा, भले रस्त्यावर पार्किंगची सोय नसू द्या… सांगलीकरांची अजिबात तक्रार नाही. पण भविष्यात पुन्हा एखाद्या पत्रकारावर ,आस्थापनावर, किंवा जनसामान्यांवर हल्ले करण्याचे धाडस झुंडशाही करणार नाही असे वातावरण निर्मितीचे आश्वासन सांगलीकरांना द्या। बस, तूर्तास इतकेच,