‘एक व्यक्ती, एक पद’,’एक कुटुंब, एक तिकीट’ या राष्ट्रीय काँग्रेसच्या नव्या घोषणेमुळे राज्यातील काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. या घोषणेची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून ती करावी लागेल. त्यातून कोल्हापूरसह सांगली, पुणे व वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे तीनदिवसीय चिंतन शिबिर नुकतेच उदयपूर (राज्यस्थान) येथे झाले. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिराच्या कालच्या (ता. १५) शेवटच्या दिवशी पक्षात ‘एक व्यक्ती, एक पद’ व ‘एक कुटुंब, एक तिकीट’ याची अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी जेव्हा संपूर्ण देशात आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळीही ही घोषणा करण्यात आली होती; पण त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. उलट त्यानंतर पक्षांतर्गत घराणेशाहीतच वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे.
या नव्या घोषणेची सुरुवात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून करावी लागले. श्री. पटोले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, याशिवाय ते आमदारही आहेत. सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, पुण्याचे जिल्हाध्यक्ष जगताप व वाशिमचे जिल्हाध्यक्ष अमित झनक हे तिघेही आमदार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हेच जिल्हाध्यक्ष आहेत, याशिवाय ते राज्यमंत्रीही आहेत. काँग्रेसच्या कार्याध्यक्ष म्हणून आमदार प्रणिती शिंदे आहेत. नव्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास या सर्वांना एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल, त्यातही संघटनेच्या पातळीवर असलेले पद त्यांना सोडावे लागेल.
‘एक कुटुंब, एक तिकीट’ याची सुरुवात कोल्हापुरातून झाल्यास पालकमंत्री पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. सांगलीचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे चुलते मोहन कदम हे विधान परिषद आमदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात श्री. पाटील यांच्या प्रयत्नातून पक्षाचे दिवस चांगले आहेत. भविष्यात यांना डावलून पक्ष निर्णय घेणार का? महत्त्वाचा प्रश्न आहे.
अंमलबजावणी अशक्य….
पक्षांतर्गत घेतलेला हा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी अशक्य आहे. जिल्ह्यात पालकमंत्री पाटील यांचे मोठे प्रभाव क्षेत्र आहे, त्यांच्या बाबतीत याची अंमलबजावणी म्हणजे पक्षाच्या पायावरच धोंडा पाडून घेण्यासारखी स्थिती आहे. सांगलीतही कदम कुटुंबीयांना वगळून काँग्रेसचे अस्तित्वच काय ? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रभाव असलेल्या कुटुंबाकडून पदे काढून घेणे पक्षांसमोरच आव्हान असेल.