खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शेंडा पार्क येथे ११०० खाटांच्या भव्य शासकीय रुग्णालयाचे काम; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
कोल्हापूर शहरामध्ये शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालय इमारती मध्ये त्रुटी आढळल्यास त्याची त्रयस्थ यंत्रणेकरवी चौकशी करण्यात येईल. या यंत्रणे कडून प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय बांधकाम करणाऱ्या मक्तेदारास देयके दिली जाणार नाहीत, असा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. गिरीश कांबळे, संबंधित कंत्राटदार आदी उपस्थित होते.या पहाणीनंतर मुश्रीफ म्हणाले, या ठिकाणी ११०० खाट, ६०० सामान्य खाट,२५० खाट कर्करोग आणि २५० खाट अतिविशेष रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम रुग्णालय बांधण्याचा अनुभव असलेल्या केंद्र सरकारची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. या कंपनीची नेमणूक महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे. या बांधकामाचे सगळे डिझाईन आयआयटीच्या सल्ल्यानुसार सुरु असते.
सध्या कार्यरत नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी आंध्र प्रदेशची असून तिने देशभरामध्य २०० हून अधिक रुग्णालये बांधलेली आहेत. या कंपनीची वार्षिक उलाढाल साधारणता २४ हजार कोटीची असून या कंपनीने विमानतळ, रस्ते, पूल, २६ मजली हॉस्टेल्स तसेच मोठ्या इमारतींची उभारणी देशभरामध्ये केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात सुरु असलेले काम दर्जेदारच होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. बांधकामध्ये काही त्रुटी अथवा उणिवा आढळल्यास आयआयटीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मक्तेदार कंपनीला कोणतेही देयक दिले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब रुग्णांची सोय होणार असल्याने हे काम दर्जेदार होण्याकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी येत्या ३१ मार्च पर्यंत ही तिन्ही रुग्णालये पूर्ण होऊन लोकार्पण होईल असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे २५० बेडचे बांधकाम त ठिकाणी किडनी, लिव्हर व हार्ट ट्रान्सप्लांट सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा,लागणारे साहित्य व डॉक्टर्स यांचा पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर कॅन्सरचे २५० बेडचं हॉस्पिटल्स आहे त्या ठिकणी नवी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या गुणवत्तेइतकेच दर्जेदार असे वैद्यकीय उपचार कॅन्सर रुग्णांवर करण्यात येतील. याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक व गोवा राज्यालाही होईल .

