खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी पालखी १८ जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून, या चार दिवसांत वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल २,७०० हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि विविध विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
पालखी मार्ग, प्रमुख मुक्कामस्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या, पाकीटमारी तसेच महिलांशी गैरवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील डीबी पथकांसह विशेष गस्त ठेवण्यात येणार आहे. संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
सोहळ्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देत पोलिसांनी २४ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले असून, आणखी १६ जणांविरुद्ध तडीपारीची प्रक्रिया सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
बंदोबस्तासाठी सातारा जिल्हा पोलिस दलातील ६३ अधिकारी, ७३९ पुरुष पोलिस, ९७ महिला पोलिस, १,३०० होमगार्ड, ७५ वाहतूक पोलिस, दोन आरसीपी प्लाटून आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यांतील अतिरिक्त पोलिस बळ, १८ अधिकारी, ३० वाहतूक अंमलदार तसेच एसआरपीएफ कंपनीचीही मदत घेण्यात आली आहे.
पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण सुरक्षा आराखडा राबविण्यात येत आहे. बेदरकार वाहनचालक, महिलांची छेडछाड करणारे आणि गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

