खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
पंढरीला निघालेल्या तीन महिला वारकरी सोमवारी सकाळी जेजुरीजवळ झालेल्या अपघातात ठार झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे, तर मिरज तालुक्यातील तीन गावात शोककळा पसरली असून आज दिवसभर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
आज सकाळी आठ वाजणेच्या सुमारास जेजुरी ते सासवड मार्गावर बेलसर टोल नाक्याजवळ पायी निघालेल्या वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसल्याने मोठी दुर्घटना घडली. दिंडीत सांगली जिल्ह्यातील वारकरी असलेल्या समूहातच ट्रक घुसल्याने मिरज तालुक्यातील तीन महिला वारकरी ठार झाल्या आहेत. यामध्ये मिरज तालुक्यातील कवलापूर येथील रहिवाशी नंदा पवार (वय ६०), मालगाव येथील राजश्री सलगरे (वय ५५) आणि कसबे डिग्रज येथील राजश्री भोसले (वय ५५) या महिला वारकर्यांचा समावेश आहे. तर अपघातात आक्काताई कोळी (शिरगाव), शांता कालकोपर (मिरज), कासाबाई रास्ते, लक्ष्मी गर्दे (रा.कवठेमहांकाळ) आणि शामराव चव्हाण (सांगली) हे वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने वेगवेगळ्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त संबंधित वारकर्यांच्या नातेवाईकांना घटना घडल्यानंतर तात्काळ कळविण्यात आले. यानंतर संबंधितांचे नातेवाईक तातडीने पुण्याकडे रवाना झाले असून जखमींची प्रकृर्ती अस्वस्थ असल्याने गावात असलेल्या घरच्या मंडळींचा चिंताग्रस्त झाले आहेत.
वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात प्रामुख्याने मिरज तालुक्यातील तीन महिला वारकर्यांचा दुर्देवी अंत झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पंढरीच्या वाटेवर मुखी हरीनाम घेत पायी चालत निघालेल्या वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसलाच कसा असा सवाल उपस्थित केला जात असून तालुक्यात तीनही गावात शोककळा पसरली आहे. जखमी वारकर्याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे याची एकमेकाकडून माहिती घेतली जात आहे. मात्र, संबंधित वारकर्यांचे नातेवाईक घटनास्थळाहून आल्यानंतरच नेमकी परिस्थिती समोर येणार आहे. कवलापूर, मालगाव आणि कसबे डिग्रज ही तीन गावे तर आज शोकमग्न झाली असून गावात एकच दिंडीतील मृत महिलांच्या पापभिरू स्वभावाची चर्चा सुरू होती.
कसबे डिग्रज येथील संत ज्ञानेश्वर माउली दिंडी या नावाने गेल्या तीन दशकापासून आळंदी ते पंढरपूर अशी दिंडी काढण्यात येते. यावर्षी डिग्रज गावासह अन्य गावातील सुमारे ११० वारकरी दिंडीत सहभागी झाले असून यामध्ये ४५ महिला आहेत. सासवडचा मुक्काम झाल्यानंतर दिंडी पंढरीच्या दिशेने रवाना झाल्यानंतर हा अपघात घडला असून आज रात्री उशिरा पार्थिव गावात आणण्यात येणार असून उद्या सकाळी अंत्यविधी होतील असे वारकरी संप्रदायातील जेष्ठ लोकांनी सांगितले.

