अर्ज सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत १०, ५०० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत असल्याने अजून दोन दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे अंतिम आकडा कितीवर पोहोचतो याकडे उमेदवारांसह बँक प्रशासनाचे लक्ष आहे. दरम्यान, बीड, अकोला येथेही परीक्षा केंद्रांची सुविधा परीक्षार्थींना जिल्हा बँकेने उपलब्ध करून दिली आहे.
या भरती प्रक्रियेला २४ जूनपासून सुरुवात झाली असून, ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी बँक व्यवस्थापनाने आयबीपीएस या संस्थेची नियुक्ती केली आहे. दरम्यान, २ जुलै रोजी राज्य शासनाच्या सहकार विभागाने जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे कारण देत भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात जिल्हा बँक प्रशासनाने ६ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने याचिकेवर तत्काळ सुनावणी घेत भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने भरतीवरील अनिश्चितता दूर झाली.
स्थगितीच्या गोंधळामुळे अनेक उमेदवारांना अर्ज सादर करता आला नव्हता. त्यामुळे बँक प्रशासनाने ८ जुलैला संपणारी अर्जाची मुदत वाढवून १० जुलैपर्यंत केली. या मुदतवाढीनंतर अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जांची छाननी, पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी अशा टप्प्यांतून अंतिम निवड प्रक्रिया पार पाडणार असल्याचे बँक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेसाठी सुरुवातीला सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथे परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. मात्र मराठवाडा आणि विदर्भातूनही मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्याने उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी बीड आणि अकोला येथेही अतिरिक्त परीक्षा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.
अशी होणार भरती
– ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया
– आतापर्यंत १०, ५०० हून अधिक अर्ज दाखल
– अर्जाची अंतिम मुदत: १० जुलै
– उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भरतीला हिरवा कंदील
– सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणेसह बीड आणि अकोला येथेही परीक्षा केंद्रे
– पुढील टप्पा: अर्ज छाननी, लेखी परीक्षा, मुलाखत व कागदपत्र पडताळणी

