खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणाऱ्या ४४४ उमेदवारांच्या नोकरभरती प्रकरणी मागील काही दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वाद उफाळून आला होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नोकरभरतीला स्थगिती दिली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ४४४ उमेदवारांच्या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. पण भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणाऱ्या ४४४ उमेदवारांच्या नोकरभरतीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. तसेच वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला नियमबाह्य पद्धतीने २५० कोटींचे कर्ज दिल्याचाही आरोप केला होता. तसंच जयंत पाटील यांच्यावरही अनेक आरोप केले होते. एवढंच नाहीतर बँकेवर प्रशासकही नेमण्यात आला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
जयंत पाटील यांच्या नावाची भाजपा नेत्याला काविळ
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी भाजप आमदर गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार केला होता. 0% NPA असलेल्या बँकेवर प्रशासक आणून त्यांनाच या नोकरभरतीत हात मारायचा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नावाची या भाजपा नेत्याला काविळ झाली आहे, गोपीचंद पडळकर यांना बँकेवर प्रशासक आणून त्यांना काहीतरी चुकीचे करायचे असल्याचा पुनःरूच्चार केला. तसंचजयंत पाटील यांचा बँकेच्या कारभारात अजिबात हस्तक्षेप नसतो. उलट मार्गदर्शन असते. असे सांगून वसंतदादा पाटील कारखाना तुमच्या पोटात का खूपतोय अशी विचारणा केली. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची १००० कोटींची मालमत्ता आहे. त्या आधारे त्यांना २५० कोटींचे कर्ज दिलेले आहे. आणि ते नियमानुसारच असल्याचे मानसिंग नाईक यांनी सांगितलं होतं.


