विटा : खबऱ्या प्रतिनिधी ; विट्याच्या डान्स बारमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मातीमध्ये सांगली जिल्ह्याचे सुपुत्र तत्कालीन गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील डान्स बार वर बंदी घातली होती. आबांच्या या धाडसी निर्णयाने सर्वत्र समाधान व्यक्त केले होते.
परंतु, आता मात्र डान्स बारमधील बार बालांचा खेळ सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झाल्याने ज्युनिअर आर आर पाटील म्हणजेच युवा नेते रोहित पाटील या विषयात हात घालतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एकीकडे सांगली पोलिसांची मान सर्वोत्कृष्ट कामगिरीने राज्यात उंचावली असताना मुंबईच्या डान्सबारला फिका पाडेल असा डान्सबार विट्यात सुरू झाल्याने आता मात्र खरच पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांनी संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

स्व. आर आर पाटील यांच्यासह शहराच्या अस्मितेला काळिमा फासणारी कृत्ये समोर आल्याने जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम हे काय भूमिका घेणार ..?जिल्ह्यातील अवैध धंद्यांना ऊत कसा आला.? ठराविक लोकप्रतिनिधींना जगवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सामान्य जनतेला गुन्हेगारीस सामोरे जावे लागते आहे याचा विचार कोण करणार..?अशा एक ना अनेक प्रश्नांची नागरिकांत चर्चा सुरू आहे.

हा संपूर्ण प्रकार पाहून विटेकरांना आश्चर्याचा धक्का बसलाय, माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम याप्रकरणी काय कारवाई करणार? हे पाहण्यासाठी नागरिकांनी संयम पकडला आहे.
डान्सबार बाबत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या स्वर्गीय आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात आणि देशात स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या विटा शहरात डान्सबार सुरू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विटा शहरातील विवेकानंद नगर येथे ब्लु नाईट लाईव्ह ऑर्केस्ट्रा या नावाने राजरोसपणे सुरू असणाऱ्या डान्स बारमधील बार बालांचा खेळ सध्या सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबई पेक्षा अत्याधुनिक यंत्रणा उभा करून विटा शहरात सुरू असलेल्या या डान्सबार मधील काही व्हिडिओ पाहून विटेकरांना जोरदार धक्का बसला आहे. सोलापूर, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातून देखील हा बार बालांचा खेळ पाहण्यासाठी लोक येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

विटा पोलिसांच्या आंधळ्या भूमिकेमुळे युवा पिढीचे भवितव्य अक्षरशः धोक्यात आले आहे. परिणामी, विट्यातील विवेकानंदनगर अक्षरशः बदनाम होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे नागरी हक्क संघटनेचे अध्यक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भाऊ सुतार यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे ,तर या संपूर्ण प्रकाराविरोधात मोठी यंत्रणा लावून सुनिल सुतार यांनी विटा शहराला या मोठ्या घाणीच्या साम्राज्यातुन मुक्त करण्यासाठी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम या संपूर्ण प्रकारानंतर काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

