खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
संविधान बदलण्यासाठी राजकीय पक्षच संपविण्याचे भाजपचे उदिष्ट आहे. म्हणून नगरपालिका व महापालिका निवडणुकीत युती अथवा आघाडी होणार नाही यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात आला असा आरोप बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीत केला.
महापालिका निवडणुकीतील बहुजन वंचित आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज अॅड. आंबेडकर यांची प्रचार सभा सांगलीत झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या देशात मनुवाद्यांची सत्ता आहे. मनुवाद त्यांना आणायचा आहे. यासाठी घटना बदल करणे महत्वाचे आहे. घटनाबदल होण्यास विरोधी पक्षांचा अडसर निर्माण होत असल्याने राजकीय पक्षच संपविण्याचे भाजपचे म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे आपल्या व भावी पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचेच विचार गरजेचे आहेत.
महापालिका निवडणुक ही केवळ सत्तेसाठी नाही, तर विचारांची लढाई आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक होउन प्रचारक बनण्याची गरज आहे. नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर बहुजन वंचित आघाडीने ठिकठिकाणी १०० जागावर विजय संपादन केला. मर्यादित ताकद असल्याने भाजप वगळून इतरांशी आघाडी अथवा युती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. मात्र, राजकीय दबावातून युती होणार नाही असे प्रयत्न झाले. यामागे केवळ राजकीय पक्ष संपवणे आणि मनुवाद अंमलात आणणे हाच एकमेव हेतू आहे.
पंतप्रधान हा लोकशाहीतील लोकसेवक आहे. त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. सामान्य मतदार या देशाचे मालक आहेत. मालकांने नोकराला घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र, त्यासाठी विचारांची लढाई आपणाला करावी लागणार आहे. आपले पंतप्रधान म्हणजे विश्वगुरू असल्याचे कथन काही मंडळीकडून होते, मात्र, जगात अमेरिकेचे ट्रम्प, चीनचे जिनपिंग आणि इटलीचे पुतीन हे तीनच विश्वगुरू आहेत. ते चौथा विश्वगुरू मान्य करणार नाहीत असेही ते म्हणाले.

