सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे. महाविकास आघाडीचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने केला जातो.
तर हे सरकार पडणार, हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असं भाकित भाजप नेते करत असतात. अशावेळी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. कारण महाविकास आघाडीचं सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही, अशा शब्दात खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. आम्ही काही मंत्रीपद मागायला आलो नाही. ना सत्ता मागायला आलोय. फक्त महाविकास आघाडीत आम्हाला त्रास होतोय, अशी खंत अनिल बाबर यांनी बोलून दाखवली आहे.
शिवसेनेच्या वतीनं आज आटपाडीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं शेतकरी वर्गही उपस्थित होता.
निधी वाटपावरुन शिवसेना नेते आणि मंत्री नाराज
यापूर्वी शिवसेना आमदारांनी निधीवाटपावरुन जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी दिला जातो. तसंच त्यांच्या आमदारांचं काम लवकर होतात. मात्र, शिवसेना आमदारांची अवहेलना सुरु असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. इतकंच नाही तर त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती.
राजेश टोपेंनीही व्यक्त केली जाहीर नाराजी
तर काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही गेल्या महिन्यात जाहीर व्यासपीठावरुन शिवसेना नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी होत असल्याचा आरोप टोपे यांनी केला होता. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय हे सत्य आहे. त्यामुळे भुमरे असतील वा सत्तार असतील त्यांना एकच सांगतो, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करु नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा, असंही टोपे म्हणाले होते.

