शिरोळ प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शिरोळ नगरपरिषदेकडील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाने पर्यावरण व प्रदूषण विभागाच्या नियम व अटी धाब्यावर बसवून शासकीय नियमांचे थेट उल्लंघन करून पदाधिकारी,प्रशासन व ठेकेदार सह्याद्री अँग्रोचे सर्जेराव पुंदे यांनी संगनमत करून मागील पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक कागदोपत्री आरोप करून भ्रष्टाचार प्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे फौजदार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून याला नरळे यांनी कागदपत्रांचे अवलोकन करून गुन्हा दाखल करण्याची आश्वासन दिल्याची माहिती माजी उपसरपंच पृथ्वीराजसिंह यादव यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.
हजेरी पत्रक, बायोमेट्रिक हजेरी, कामगारांची संख्या याबाबतचे अद्यावत रेकॉर्ड करण्याची जबाबदारी नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित विभागाची असताना ठेकेदार व अन्य संगनमतधारकांना मदत होईल अशे कामकाज करून चार वर्षात प्रत्येक महिन्याला सुमारे साडे सात लाख रुपये (७.५ लाख) या प्रमाणे कोठ्यावधी रुपयांची रक्कम घशात घातली आहे. टेंडरमधील करारानुसार दरदिवशी ७८ कामगार हजर करण्याची सक्ती असताना प्रत्येक्षात ३८ कामगार उपस्थित ठेऊन, उर्वरित ४० कामगारांचे प्रती दिवस, एका कामगार मागे ६५० रुपये प्रमाणे दररोज २६ हजार रुपये खिशात घातल्याचे कागदोपत्री दिसत आहे.या शिवाय ओला, सुका व विषारी कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करून शास्त्रशुध्द पद्धतीने विल्हेवाट करण्याकरिता प्रती वर्षी निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे घनकचरा डेपोवर शेकडो टन ओला व सुका कचरा उघड्यावर पडून आहे.
यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या नियमावलीला बगल देऊन कामगारांची संख्या जादा दाखवून त्यांच्या पगाराची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे कागदोपत्री स्पष्ट होत आहे. या शिवाय कामगारांचा प्रोव्हीडंट फंड PF, राज्य विमा संरक्षण योजना ESI अशा कोणत्याही रकमा जमा न करता त्या परस्पर काढून घेऊन कामगारांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करून शासकीय नियमावलीला तिलांजली देऊन तिजोऱ्या भरण्याचे काम ठेकेदार व अन्य सहभागी यांनी केले असल्याचे यादव यांनी नमूद केले.दरम्यान घन कचरा प्रक्रियामध्ये पाच वर्षात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी अजय नरळे यांची भेट घेतली असता त्यांनी कागदपत्राचे अवलोकन करून फौजदारी गुन्हा दाखल करणे विषयी सहमती दर्शवली आहे.
लवकरात लवकर घनकचरा प्रक्रीयेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजांवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा यादव यांनी दिला आहे.


