खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राज्यातील भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष पदावरील असलेल्या अनिश्चिततेला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावावर भाजपामध्ये सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले असून, लवकरच त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र चव्हाण ३० जूनला प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरतील, तर १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरळीच्या डोम येथे त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
या कार्यक्रमाला भाजपाचे (BJP) सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजुजू यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल, अशीही माहिती समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये गेले काही दिवस चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळत असून, रविंद्र चव्हाण यांच्या रुपाने भाजपाला अनुभवी, कार्यक्षम व संघटन कौशल्य असलेला अध्यक्ष मिळणार असल्याचा दावा पक्षातील वरिष्ठ नेत्या करत आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीला बळ देण्यासाठीच भाजपाने (BJP) हा मोठा निर्णय घेतला असून, रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. यामुळेच १ जुलै रोजी होणारी ही घोषणा राज्याच्या राजकारणात नवा टप्पा ठरू शकते, असेच बोलले जात आहे.
२९ जूनपासून प्रक्रिया, ३० जूनला अर्ज दाखल
भाजपाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी दिलेल्या माहितीनुसार –
- २९ जून रोजी राज्य परिषद सदस्यांची घोषणा केली जाणार आहे.
- ३० जून रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करू शकतील.
- १ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाईल.
राज्यातील भाजपा नेतृत्वात बदलाचे संकेत?
ही निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक वरिष्ठांची नावे चर्चेत आहेत.
- आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तसेच २०२९च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपाचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे.
- सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारमध्ये भाजपाची ताकद वाढवण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.
राष्ट्रीय परिषद सदस्यांचीही निवड
प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर राष्ट्रीय परिषद सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राष्ट्रीय परिषद ही भाजपाच्या धोरणनिर्धारण आणि संघटनात्मक निर्णय प्रक्रिया आखणारी महत्त्वाची संस्था असल्याने, राज्यातील प्रतिनिधी कोण होतील याकडे पक्षातील सर्व गटांचे लक्ष लागले आहे.
“लोकसभा- विधानसभा लक्षात घेऊनच निर्णय” – राजकीय वर्तुळातील चर्चा
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, “ही निवडणूक केवळ संघटनात्मक नाही, तर २०२९ पर्यंतचा राजकीय रोडमॅप ठरवणारी असेल. विशेषत: महाराष्ट्रातील महायुतीच्या भविष्यासाठी आणि मराठा, ओबीसी, दख्खन, विदर्भातील समतोल साधण्यासाठी नवे नेतृत्व ठरवले जाईल.”


