
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मुंबई लोकलमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ठाण्यातील दिवा- मुंब्रा दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवाशी नेमके लोकलमधून पडले की, पुष्पक एक्सप्रेस याबाबत स्पष्टता नाही. कसारा फास्ट लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात असताना ही दुर्घटना घडली.
आठ ते बारा प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे प्रवासी दरवाज्यावर लटकून प्रवास करत असल्याने घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार सहा प्रवाशी मृत झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचे कारण ट्रेनमधील क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याचे मानले जात आहे. ट्रेन इतकी भरलेली होती की, प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करत होते, त्यादरम्यान हा अपघात झाला.
सध्या रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील या दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. फडणीस हे आज सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या शुभारंभासाठी सोलापूरला येणार होते. मात्र मुंबईतील दुर्घटनेमुळे हा दौरा रद्द झाला आहे.


