खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा खोक्याभाईची दहशत आणि इतर प्रकरणात अपहरण आणि बेदम मारहाण ही कॉमन गोष्ट दिसून आली आहे. यामुळे राज्यासह बीडची नवी ओळख बीड पॅटर्न अशी झाली आहे.
आता सांगलीत देखील बीड पॅटर्न उदयास येत असून येथे एका तरूणाचे अपहरण केल्याची आणि त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेत टायगर ग्रुपचा हात असल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरणी पोलिसांत टायगर ग्रुपच्या 7 सदस्यांसह एका अनोळख्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून शहरातील एका युवकाचे अपहरण करण्यात आले. त्याला टायगर ग्रुपच्या कार्यालयात आणत स्टम्प आणि स्टील पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ओम विनायक पाटील (वय-20, रा. शंभर फुटी रस्ता, त्रिमूर्ती कॉलनी, पडक्या विहिरीनजीक, सांगली) असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून त्यास टायगर ग्रुपच्या सदस्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी आता गंभीर जखमी युवकाचे टायगर ग्रुपच्या सदस्यांविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित रोहित माने, पिंटू माने, तेजस कोळेकर, जय बिराजदार, जीवन कांबळे, धनंजय खरात, बबलू उर्फ रोहित पाटील आणि एका अनोळख्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी अधिक दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ओम पाटील हा मजुरीचे काम करतो. संशयित जीवन कांबळे आणि फिर्यादी ओम यांच्यात सहा महिन्यांपूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी (28 मे) रोजी रात्री बाराच्या सुमारास संशयित रोहित माने आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीने ओम यास घरातून ओढून बाहेर काढले. दुचाकीवरून त्याचे अपहरण केले.
तसेच सांगली कोल्हापूर रस्त्यावरील टायगर ग्रुपच्या कार्यालयात ओम पाटील याला आणले. तेथे काही वेळ डांबून ठेवत सर्व संशयितांनी त्यास बेदम मारहाण केली. ओम यास शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचे आता समोर आले असून त्याचा मोबाईल देखील फोडण्यात आला आहे. या प्रकारामुळे सांगलीतील गुंडागर्दी आता चव्हाट्यावर आली असून एका युवकांचे अपहरण करण्यापर्यंत या ग्रुपचे धाडस वाढले आहे. यामुळे हा ग्रुप वादात सापडला आहे. तर टायगर ग्रुपच्या दहशतीला कोणाचे पाठबळ आहे? असा सवाल आता केला जातोय.


