दारूबंदी ठराव फक्त कागदावरच ;लखन सकट यांनी केली पोलखोल
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
गावातील ग्रामसभेत घेतलं जाणारे ठराव फक्त कागदावरच राहत आहेत. गावात देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे एवढच नाही तर दारुड्यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच दारूचा अड्डा केला आहे की काय ? असा संतप्त सवाल काँग्रेसचे युवा नेते लखन रमेश सकट यांनी उपस्थित केला आहे. सकट यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात असणाऱ्या सीएससी सेंटरच्या शेजारी पाण्याच्या टाकीजवळ आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या प्रवेशाजवळच देशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा पडलेला खच निदर्शनास आणून दिला.
यावेळी सकट म्हणाले की, गावात दारू बंदीचा ठराव ग्रामसभेत यापूर्वी अनेकवेळा घेण्यात आला आहे मात्र दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. एवढच नाही तर दारुड्यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच दारूचा अड्डा बनवला आहे. कार्यालय परिसरात सीएससी सेंटरच्या शेजारी दर शनिवारी बाजार साठी येणाऱ्या ग्रामस्थांना व बाजार करू मंडळीना पाण्याची सोय व्हावी म्हणून पाण्याची टाकी बसवली आहे मात्र हा मूळ उद्देश बाजूला राहिला असून रात्री दारुडे याठिकाणी टाकीतील पाणी दारूत मिसळून पिण्यासाठी जास्त उपयोग करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. टाकीशेजारी देशी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे हे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिसत नसेल का ? छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात प्रवेश करतो त्याठिकाणी बसण्यासाठी बाकडी ठेवली आहेत तिथंही रिकाम्या दारूच्या बाटल्या पडल्या आहेत.
क्रीडांगणावर बाजार भरतो. दर शनिवारी गावच्या कानाकोपऱ्यातील महिला ग्रामस्थ तसेच लहान मुले बाजाराला येतात आणि तालुक्यातील भाजीपाला व्यापारी ही येत असतात. गावच्या दर्शनी भागात रिकाम्या दारूच्या इतक्या प्रमाणात पडल्या असतील तर गावाच्या इतर भागातील काय परिस्थिती असेल ? याचा ते विचार करत असतील. मुळात यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे मात्र सत्ताधारी मंडळी वेगळ्याच नादात गुंग असल्याचे दिसत आहे. आम्ही ग्रामपंचायत मध्ये आमच्या नेत्याची सत्ता यावी म्हणून प्रयत्न केले आहेत मात्र सध्या वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही चुकीला चूक म्हणणारे कार्यकर्ते आहे.
नेवरीत विरोधक शांत मात्र सत्ताधारीच आक्रमक
तालुक्यातील नेवरी ही मोठी ग्रामपंचायत आहे. इथ सरपंचसह काँग्रेस प्रणित आघाडीचे 8 तर भाजप प्रणित आघाडीचे 5 सदस्य आहेत. गावातील सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभारावर विरोधकांनी टीका करायची असते मात्र गेली काही दिवस झाले विरोधक शांत आहेत आणि सत्ताधारी काँग्रेस प्रणित आघाडीचे नेतेच आक्रमक झालेले पहावयास मिळत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे जाणकारांकडून बोललं जात आहे.


