खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महाराष्ट्र राज्याची गौरवशाली परंपरा रसातळाला मिळवत सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या कारट्यांनी महाराष्ट्राचा पुरता बिहार करुन ठेवलाय. होय. राज्यातील मंत्र्यांची मुलं मोकाट सुटलीयेत आणि जनता बेजार झालीये.
त्याला कारण ठरलंय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलाचे कृष्णकृत्य. मात्र सिद्धांत संजय शिरसाठच नाही तर ही यादी मोठीये…आणि यांच्यामुळेच हे सरकार बदनाम होतंय असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. पाहुयात महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मुलांचे हे तालिबानी कारनामे.
1. सिद्धांत संजय शिरसाट (संजय शिरसाट यांचा मुलगा)
एका विवाहितेनं सिद्धांत शिरसाट यांच्यावर ब्लॅकमेल करून लग्न करण्याचा, त्यानंतर गर्भपात करून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप
2. ऋषिराज तानाजी सावंत (तानाजी सावंत यांचा मुलगा)
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंतनं घरातून लाखो रुपये घेऊन महागड्या चार्टर्ड विमानाने बँकॉकला जाण्याचा प्रयत्न केला. तानाजी सावंतांनी शासकीय यंत्रणा शोधासाठी लावली आणि मुलाला चेन्नईतून माघारी आणलं.
3. संकेत चंद्रशेखर बावनकुळे (चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा)
नागपूरमध्ये संकेत बावनकुळे यांने भरधाव ऑडी कारने पाच वाहनांना धडक दिल्याचा आरोप. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप.
4. आदित्यराज जयकुमार गोरे (जयकुमार गोरे यांचा मलगा)
सातारा-कोल्हापूर रोडवर आदित्यराज गोरे याने जीवघेणे बाईक स्टंट केल्याचे व्हिडीओ समोर. रिल्ससाठी स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात घातल्याचा विरोधकांचा आरोप .
5. राज प्रकाश सुर्वे (प्रकाश सुर्वे यांचा मुलगा)
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर एका कंपनीच्या सीईओचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा आरोप. पोलिसांत अपहरण, धमकी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल
मंत्र्यांच्या या पुढच्या पिढीनं आपल्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिमेला गालबोट लावलय. “राज्यकारभार तर करायला आले, पण स्वत:चं घर सांभाळता येत नाहीत” अशी स्थिती या सत्ताधाऱ्यांची झाल्याचं दिसतंय. कोणी अपहरणात, कोणी स्टंटमध्ये तर कोणी हुंडाबळीत पकडला जात असल्यामुळे हे तलवारीच्या पातीवर बसलेले राजपुत्र कायदा सुव्यवस्थेला थप्पड मारतायेत. त्यामुळे अख्खी हयात राजकारणात घालवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची कारकिर्द या कारट्यांच्या कारवायांमुळे बदनाम तर होते आहेच. पण आपल्य़ा महाराष्ट्राची अब्रू निघतेय ती वेगळीत. त्यामुळे पुढाऱ्यांनों आता तरी जागे व्हा आणि स्वत:च्या बिघडलेल्या अवलादींना सरळ करा असं म्हणण्याची वेळ आलीये.


