खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राज्याचा राजशकट हाकणारे आणि राज्याच्या प्रशासनाचे मुख्यालय असलेले मंत्रालय आज पाण्यात गेले. पावसाच्या पाण्यामुळे मंत्रालय पाण्याखाली जाण्याची ही गेल्या अनेक वर्षांतली ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते.यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली.
मुंबईत रात्रभर झालेल्या पावसाने अनेक सखल भागांत पाणी साचले असून यातून मंत्रालयही सुटले नाही. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने मंत्रालय परिसर जलमय झाला होता. या साचलेल्या पाण्यातून वाट काढत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मंत्रालय गाठावे लागले.
मंत्रालयाच्या गार्डन गेट, आरसा गेट येथे आज सकाळच्या वेळेत गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे मंत्रालय गाठताना कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. मंत्रालयाच्या आवारातील शासकीय वाहने अर्धी पाण्यात बुडालेली पहायला मिळाली. यापूर्वी कधीही मंत्रालयात अशा प्रकारे पाणी साठले नव्हते. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ठप्प झाल्याचे उघड झाले आहे.
कर्मचाऱ्यांना घरी पाठवल
हवामान खात्याने पुढील चोवीस तासांसाठी मुंबई तसेच मुंबई उपनगरसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. पावसामुळे उपनगरीय गाड्या बाधित झाल्या आहेत. मंत्रालयात कामास येणारे शासकीय कर्मचारी हे लांबून प्रवास करून येत असतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालये दुपारी चार वाजताच सोडण्याचा निर्णय घेतला. सामान्य प्रशासन विभागाने तसे परिपत्रकही जारी केले.
महत्त्वाच्या कार्यालयांना फटका
राज्याचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग, बिनतारी यंत्रणा, मुख्य सचिव कार्यालय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री कार्यालये अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये मंत्रालयीन इमारतीमध्ये आहेत. पण पहिल्याच पावसाचा या सर्व कार्यालयांना मोठा फठका बसल्याचे उघड झाले आहे.


