“आमच्या गावातील कोणत्याही संस्थेच्या किंवा सार्वजनिक निवडणुकीत EVM मशीनचा वापर करू नये, आमच्या ग्रामसभेचा अपमान करून EVM मशीन लादली गेली, तर आम्ही बहिष्कार घालू.”
सांगलीमधील वाळवा तालुक्यातील बहे ग्राम पंचायतीनं अशी ठाम भूमिका घेतली आहे. या ठरावाची प्रत बहे ग्रामपंचायतीच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदारांकडे सुपूर्द देखील करण्यात आली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा तालुका म्हणून वाळवा तालुका क्रांतिभूमी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील बहे गावामध्ये EVMच्या विरोधात ठिणगी पडली आहे.
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ऐतिहासिक ठराव गावानं घेतला आहे. इतकंच नव्हे तर सरकारनं याकडं दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा देखील ठराव संमत केलाय. ग्रामसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलेला सदर ठराव हा इस्लामपूरच्या तहसीलदारांना देखील सुपूर्द करण्यात आला आहे.
- ‘क्रांतिसिंह नाना पाटलांकडूनच मिळाला क्रांतीचा वारसा’
वाळवा तालुक्यातील बहे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जन्मगाव. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारनं ब्रिटिश राजवटीला सळो-की-पळो करून सोडलं होतं. ही या तालुक्याची ओळख मानली जाते. त्यामुळे लोकशाहीच्या संवर्धनासाठी क्रांतिसिंह पाटलांकडून प्रेरणा घेऊन आपण EVM विरोधात पाऊल उचलले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
10 जानेवारी रोजी बहे गावच्या ग्रामपंचायतीनं ग्रामसभेमध्ये एकमतानं EVM वर मतदान घेऊ नये, असा ठराव 10 जानेवारी रोजी तहकूब झालेल्या ग्रामसभेत केला आहे. बहे गावची लोकसंख्या 3 हजार 500 इतकी आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं एक सधन गाव म्हणून त्याची ओळख आहे.