राज्यात महायुतीचे सरकार आले असून हे सरकार लाडक्या शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या मतांवर आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उफमुख्यमंत्र्यांनी अनेकदा कबूल केलं आहे.
पण आता याच सरकारला लाडक्या शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा विसर पडत चालला आहे की काय असा सवाल ग्रामीण भागातील जनता करताना दिसत आहे. सांगलीत शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करताना अनेकदा आंदोलन केले आहे. पण कोठेच या माहामार्गाला विरोध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे. यामुळे संतापलेल्या बुधगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पोस्टकार्ड लिहत सरकारला जागे करत निषेध नोंदवला आहे. आता याच बुधगावावक बाधित जमिनीच्या महिला शेतकऱ्यांनी देखील आपल्या रक्ताने पोस्टकार्ड लिहत लाडक्या मुख्यमंत्री भावाला साद घालत महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे.
नुकताच शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी बुधगाव (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्ट कार्ड लिहुन मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. याला दोन दिवसही उलटत नाही तोच महिला शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पोस्ट कार्ड लिहुन मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत. यासाठी महिलांनी आपले रक्त बाटलीत काढून बोरुने पत्र लिहिली आहेत.
यावेळी बाधित महिलांनी, मुख्यमंत्री फडणवीस जी, माझी जमिन बागायती आहे. सर्व जमिन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे माझी जमिन प्रस्तावीत महामार्गासाठी द्यायची नाही, तसेच या महामर्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे. त्यामुळे सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपुर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहली.
नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही, असे म्हटलं होतं. त्यापाठोपाठ आता नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांनीही शक्तिपीठ महामार्ग होणारच, असे विधान करून शेतकऱ्यांच्या रोषाला हवा देण्याचे काम केलं आहे. आजपर्यंत आमदार क्षीरसागर गप्प का होते? आगदी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसुचना रद्द केली त्यावेळीही ते बोलले नाहीत? शक्तिपीठचे समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच कोठुन आला? हिम्मत होती तर निवडणुक प्रचारात त्यांनी हे विधान करायचे होते. व्यापार आणी विकासाच्या गप्पा मारुन शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे त्यांचे मनसुबे उधळुन लावले जातील असा इशारा महिलांनी क्षीरसागर यांना दिला आहे.
विकासाचे कारण पुढे करून शक्तिपीठ महामार्गाला रेटण्याचे काम सध्या राज्य सरकार आणि सत्तेतील आमदार करत असल्याचा दावा देखील बाधितांनी केला आहे. तसेच विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
एकीकडे सर्व आमदारांशी चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतायत मग सांगलीचे आमदार खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात. याचे उत्तर मुख्यमंत्री देतील काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठवली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त प्रश्न महिला शेतकऱ्यांनी बैठकीत मांडले. मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड लिहण्याचे जे अवाहन केले आहे. त्याला महिला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वत:च्या रक्तानी पोस्ट कार्ड लिहली.
यावेळी उमेश देशमुख, महेश खराडे, उमेश एडके, प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, पी. एम. आप्पा, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, अनिल डुबल, रामदास पाटील, सरपंच वैशाली पाटील, शुभांगी शिंदे, उपसरपंच वनीता पाटील, तृप्ती पाटील, सुषमा पाटील उपस्थित होते.